रविवार, २९ ऑगस्ट, २०१०

प्रांतांच्या गोष्टी - काही संदर्भ

डिस्क्लेमर: लोकप्रशासनावरील हा ऑथेंटिक वगैरे लेख नाही. प्रशासनाशी सहसा संबंध न येणाऱ्या मित्रांना ढोबळ कल्पना यावी एवढाच हेतू आहे. कुणी भर टाकल्यास स्वागत आणि आनंद आहे. काही चूक आढळल्यास अवश्य सांगावे.

प्रेरणा (!)-

पण मला प्रांत म्हणजे कलेक्टर/डेप्युटी कलेक्टर की अजुन कुठली पोस्ट ते अजुन कळल नाही.

*******

जिल्हा प्रशासनामध्ये दोन प्रमुख उतरंडी असतात. राज्या राज्यांनुसार थोडे फरक असतात. प्रस्तुत संदर्भामध्ये –

विकास (डेव्हलपमेंट) उतरंड / हाएरार्की–

कलेक्टर – पीडी(डीआरडीए)/ अध्यक्ष जि.प. – बीडीओ/ सभापती पंचायत समिती – पीइओ/ सरपंच

पीडी(डीआरडीए) – प्रोजेक्ट डायरेक्टर (डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी) (महाराष्ट्रात सीइओ असतात, पीडी पेक्षा रॅंक आणि जबाबदारीने वरचे पद); बीडीओ – ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर; पीइओ - पंचायत एक्स्टेन्शन ऑफिसर (महाराष्ट्रात ग्रामसेवक असतात.).

महसूल (रेव्हेन्यू) उतरंड –

कलेक्टर (जिल्हाधिकारी/ जिल्लापाळ) – सबकलेक्टर (उपजिल्हाधिकारी/ उपजिल्लापाळ - प्रांत) – तहसीलदार – रेव्हेन्यू इन्स्पेक्टर.

(रेव्हेन्यू इन्स्पेक्टर हा साधारणपणे पन्नास साठ गावे पाहतो. जमीनीचे सर्व कागद याच्या ताब्यात असतात. सरकारची शेवटची कडी. पृथ्वीवरचा सर्वात महत्त्वाचा माणूस! आपल्याकडे जसा तलाठी!)

याशिवाय कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी या महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडे असते. ते एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतात. म्हणजे कलेक्टर असतो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट (डीएम), सबकलेक्टर – सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट (एसडीएम), तहसीलदार – एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. ही मंडळी क्रिमिनल प्रोसीजर कोड, तसेच पोलीस ऍक्ट अंतर्गत काही अधिकार बाळगून असतात. कायदा सुव्यवस्थेसाठी हे जबाबदार असतात, आणि पोलीसांच्या साहाय्याने त्यांनी हे काम करायचे असते. गुन्हे तपासामध्ये यांचा काही संबंध नसतो. ते पोलीसांचे काम. म्हणजे पोलीसांना दुहेरी काम असते – कायदा-सुव्यवस्था, आणि गुन्हे अन्वेषण. [हे ग्रामीण भागात. शहरी भागात पोलीस कमिशनरेट असेल, तर असे अधिकार पोलीसांकडेच असतात. म्हणून त्यांना कमिशनर असे पद असते. म्हणजे आयुक्त – आयोगाचे अधिकारी, अर्धन्यायिक काम. पोलीस त्यामुळे कायदा सुव्यवस्था संपूर्णपणे सांभाळतात. तसेच वेगवेगळ्या किरकोळ परवानग्या/ लायसेन्स – मोर्चा/ लाउडस्पीकर/ इ. तेच देतात.]

तसेच, डिझॅस्टर मॅनेजमेंट ही संपूर्णपणे रेव्हेन्यू अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. इमर्जन्सी ड्यूटी यांच्याकडे असते. उदा. पूर, दुष्काळ, उष्माघात, अपघात, इ.

निवडणुकांचे काम रेव्हेन्य़ू अधिकाऱ्यांनाच करावे लागते.

जनगणना यांच्याकरवीच.

व्यक्तीच्या ओळखीशी संबंधित रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, पासपोर्टसाठी प्रमाणपत्र इ. दाखले देण्याचे अधिकार यांच्याकडे असतात. कदाचित माणसाची ओळख जमिनीशी निगडित असते, आणि जमिनीचे काम बघणारे लोक म्हणून असेल. (काही राज्यांत हे अधिकार लोकनियुक्त प्रतिनिधींना दिलेले आहेत, पण अशी प्रमाणपत्रे सगळीकडे ग्राह्य धरली जात नाहीत, फॉर ऑबव्हियस रीझन्स, आणि मुळातच ते त्यांचे काम नव्हेच.)

ही ठळक कामे. याशिवाय बरीच कामे असतात.

इतर विभाग – लाइन डिपार्टमेंट्स

यांना जिल्हे नसतात. म्हणजे यांचे जिल्हे थोडे वेगळे असतात असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. म्हणजे असं – प्रत्येक खात्यासाठी एकेक मंत्री असतात. ते राज्यातले त्या त्या खात्याचे टॉप एक्झिक्युटिव्ह. हे टू इन वन असतात – एक्झिक्युटिव्ह पण आणि लेजिस्लेटर पण. जसे रेव्हेन्यू अधिकारी टू इन वन असतात – एक्झिक्युटिव्ह पण आणि (क्वासी) ज्युडिशियल पण.

मंत्री – सेक्रेटरी – डायरेक्टर – जिल्हा स्तरावरील अधिकारी.

उदा. शिक्षण मंत्री – शिक्षण सचिव – शिक्षण संचालक – जिल्हा शिक्षण अधिकारी – शिक्षण निरीक्षक.

हे ढोबळ उदाहरण झाले. प्रत्यक्षात थोडी अधिक गुंतागुंत असते. म्हणजे, वरील उदाहरणात बीडीओ, जिल्हा परिषद, कलेक्टर यांचेही अधिकार मिसळलेले असतात. शिवाय, सचिवालयाची वेगळी उतरंड असते, निर्देशालयाची (डायरेक्टोरेट/ डिरेक्टोरेट) वेगळी उतरंड.

सेक्रेटरी – सचिव हे खरे नोकरशहा. ब्युरोक्रॅट्स. मंत्र्यांचे सल्लागार. हे एक्झिक्युटिव्ह यंत्रणेचे सगळ्यात वरचे अधिकारी. डायरेक्टर म्हणजे फिल्डवरचे लोक आणि ब्युरोक्रॅट्सना जोडणारी कडी. यांच्या कामात सचिव आणि जिल्हा स्तरावरचे अधिकारी यांच्या प्रोफाइलचा संगम असतो. जिल्हा स्तरावरचे अधिकारी म्हणजे फिल्डवरचे लोक.

फिल्डवरचे सगळे अधिकारी जरी आपापल्या उतरंडीमध्ये काम करत असले, तरीही जिल्हा प्रशासनाला टाळून त्यांना काम करता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन प्रमुख अर्थात कलेक्टर हा एकप्रकारे त्यांचा (म्हणजे सगळ्या जिल्ह्याचाच) सुपरवायजरी अधिकारी असतो.

********

विशेष टिप्पणी!

आमदार/ खासदार/ लोकनियुक्त प्रतिनिधी यात नेमके कुठे येतात हे सूज्ञांना वेगळे सांगायला नकोच.Wink
माझ्या मते ते ‘नेमके’ कुठेच नसतात, दुधात मिसळलेल्या साखरेसारखे/ मिठाच्या खड्याप्रमाणे सर्वव्यापी असतात! त्यांच्या चवीनुसार व्यवस्था नीट काम करते किंवा फेफरे आल्यासारखी वागून आपली वाट लावते.


शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

खरे खोटे - भाग १ (प्रांतांच्या गोष्टी - ४)

प्रांतांना कलेक्टरांनी एक ऍडिशनल जबाबदारी दिली होती. त्यांच्या सबडिव्हिजनच्या अखत्यारीत नसलेल्या पळसपंगा ब्लॉकच्या विकासकामांचा नोडल ऑफिसर बनवले होते. हा ब्लॉक हळूहळू नक्षलग्रस्त होत होता, आणि ब्लॉक ऑफिस भ्रष्टाचारग्रस्त झालेले होते. हरिविलासपूर पोलीस ठाण्यातल्या एका एएसआय ला नक्षलवाद्यांनी पकडून नेऊन ओलीस ठेवल्यापासून कलेक्टर आणि एस्पींची झोप उडाली होती. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पुनर्रचना जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात नव्हती, पण अनौपचारिकरीत्या त्यांनी वेगवेगळ्या विभागांतील वीस चांगले अधिकारी निवडून त्यांना जिल्ह्यातील वीस ब्लॉक्सचे नोडल अधिकारी बनवले होते. आपल्या हुकुमी एक्क्याचे पान म्हणजे नवीनच जॉइन झालेला, आणि इमेज आणि करियर बनवायला उत्सुक असलेला आय ए एस प्रांत कलेक्टरांनी पळसपंग्याशी पंगा घ्यायला पाठवला होता.

प्रांतांची स्ट्रॅटेजी होती भरपूर फिल्ड व्हिजिट्स. सरकारातला एक महत्त्वाचा अधिकारी गावांगावांतून फिरतो ही एकच गोष्ट नक्षलवादाच्या सुरुवातीच्या उसवणीला टाका घालायला बऱ्यापैकी पुरेशी होती. त्यानंतर ब्लॉक ऑफिसची झडती. पण पळसपंगा ब्लॉक होता प्रांतांच्या ठाकूरगढ हेडक्वार्टरपासून दोन तास लांब. हे वेळेचे गणित pr
असे दोन महिने गेले. एक दिवस संध्याकाळी प्रांत सेन्ससचे काम बघत रेस ऑफिसमध्ये बसले असता प्रधानबाबूंचा फोन आला. “सर आहात का? भेटायचं होतं जरा.” प्रधानबाबू म्हणजे दैनिक समाजचे वार्ताहर. संयमित बोलणारा आणि प्रांतांना आवडणारा सुसंस्कृत माणूस. प्रांतांनी लगेच होकार दिला. दहा मिनिटांत चार पाच वार्ताहर आले. त्यात सितारा टीव्ही चॅनेलचे मोहंतीबाबू पण होते. हे स्थानिक आमदारांचे भाऊ होते. या मंडळींविषयी सबडिव्हिजनमधले काही अधिकारी फारसे चांगले मत बाळगून नव्हती. ही मंडळी काही अधिकाऱ्यांकडे ‘खंडणी’ मागतात असं प्रांतांच्या कानावर आलं होतं. खरं खोटं माहित नव्हतं.पण प्रांतांना मात्र त्यांनी आपल्या सुसंस्कृत वागण्याने जिंकले होते. एक दोन वेळा प्रांत त्यांच्याच गाडीत बसून जलशुद्धीकरण प्लॅंटचा खोललेला कच्चा चिट्ठा ऑंखो देखा बघायला गेलेही होते. लॉ ऍण्ड ऑर्डर समस्येतही एक दोन वेळा या मंडळींची प्रांतांना साथ मिळाली होती. दुसऱ्या बाजूने, पत्रकारांनादेखील प्रांतांच्या गुड बुक मध्ये राहण्यात मजा येत होती. तक्रार केली की लगेच दखल आणि हालचाल होत होती. प्रांतांच्या कानाजवळ असल्यामुळे खालच्या ऑफिसांमध्ये शब्द रहात होता. असे एकूण सिम्बायोसिस होते.

मंडळी जरा सिरीयस होती. प्रधानबाबू म्हणाले, “सर आपल्याला माहीत आहे का, आपल्या सबडिव्हिजनमध्ये एक गाव असे आहे, जिथे गेली सोळा वर्षे एकही सरकारी योजना पोचलेली नाही. एवढंच नाही, तर आपल्या गाडीने तिथंपर्यंत आपण जाऊसुद्धा शकणार नाही!”

प्रांतांना आश्चर्य वाटले. “प्रधानबाबू, आपली सबडिव्हिजन इतकी पण दुर्गम नाही, इथे आल्यापासून मागच्या चार महिन्यांत मला एवढे तरी समजले आहे. अन्यथा मी अशा गावात पहिल्यांदा आल्या आल्या गेलो असतो. असो. कोणते आहे हे गाव?” आपल्या इथे कमी केलेल्या भेटींकडे तर या मंडळींचा रोख नसावा, प्रांतांना वाटून गेलं. शक्य नव्हतं. इन एनी केस इतका भटका अधिकारी ठाकूरगढने पाहिलाच नव्हता आजपर्यंत.

“सर पारुडीपोसी नावाचे हे गाव आहे. एन एच २१५ पासून आत पाच किमी. बाळीबंधपासून. बाळीबंध म्हणजे ते बघा तुम्ही त्या शहीद आयटीबीपी जवानाच्या अंत्यसंस्काराला गेला होतात, ते गाव.”

“हो, मला माहीत आहे बाळीबंध. मी दोन वेळा गेलोय तिथं. असं एखादं गाव तिथून हाकेच्या अंतरावर आहे यावर माझा विश्वास बसत नाही.”

“व्हिडीओच बघा ना सर,” मोहंतीबाबू आपला कॅमेरा बंदुकीसारखा बाहेर काढत म्हणाले.

प्रांतांना हसू आले. “विकासच नाही म्हणताय मोहंतीबाबू तर चित्रं कशाची दाखवणार आहात?”

“बाइट आणलेत ना सर, लोकांचे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे.”

“बरं. सांगा. पण त्याअगोदर मला एक सांगा – हे दुर्गम गाव तुम्हाला कसं काय सापडलं, आणि तेही आत्ता. गेली सोळा वर्षे हे गाव हायवेपासून एवढं जवळ असूनही सरकारपासून आणि तुमच्यापासून लपून कसं काय राहू शकलं? आज अचानक असं
काय घडलं की तुम्हाला याचा शोध लागला, हं?”

“सर आजचीच गोष्ट आहे. आम्ही कोर्टात बातम्यांसाठी गेलो होतो. रुगुडी ठाणेदारांनी वीसेकजण पकडून आणले होते. आम्ही विचारलं काय झालं म्हणून तर समजलं की पारुडीपोसीमध्ये एक चर्च बांधायचं चाललंय. त्यावरुन हाणामारी झाली. मग आम्ही ताबडतोब गाडी काढली आणि गेलो त्या गावात. आम्ही बीडीओंना फोन लावला आणि भेटायला येऊ का म्हणून विचारलं. त्यांनी टाळाटाळ केली. मी इथे नाही, तिथे आहे, टूरवर आहे. आम्ही म्हणालो, आम्ही ’तिथे’ येतो, तर म्हणाले मी ’तिथून’ अजून कुठे चाललोय. आणि फार तुसडेपणाने बोलले.” मोहंतीबाबूंची शेवटची वाक्यं तक्रारीच्या सुरात होती.
प्रधानबाबू म्हणाले, “सर, आम्ही योग्य आदर ठेऊन बोललो असता असं तोडून बोलणं शोभतं का बीडीओंना? तुम्ही त्यांना समज द्यायला हवी.”

“शांत व्हा. कदाचित त्यांना कलेक्टर नुकतेच बोलले असतील, मूड खराब असेल, किंवा खरंच भेटता येणं शक्य नसेल. शिवाय, तुम्ही म्हणता तसं त्यांचं बिंग बाहेर पडणार असेल, तर ते तुम्हाला टाळणारच ना? का या आणि करा माझी हजामत असं म्हणणार?” प्रांत समजावणीच्या सुरात बोलले. मंडळींच्या गालावर हसू उमटले आणि आठ्या कमी झाल्या.

मोहंतीबाबू खुर्चीत पुढे सरकले आणि म्हणाले, “सर, या गावात जायला धड रस्ता नाही. आम्हाला गाडीतून उतरून चालत जावं लागलं.”
“तुमची गाडी तर जाऊच शकणार नाही सर,” साहूजींनी भर घातली.
मोहंतीबाबू पुढे बोलले, “या गावात ना रस्ते आहेत, ना वीज. गावाच्या सभोवार घनदाट जंगल आहे. दोन तीन महिन्यांतून एकदा केंव्हातरी बारीपदाहून काही मिशनरी रात्रीच्या वेळी लपत छपत गावात येतात आणि धर्मांतरं करतात. आता परिस्थिती अशी झालेली आहे, की गावातला एकजिनसीपणा कमी होऊन ख्रिश्चन आणि हिंदू असे तट पडलेत. आपली संस्कृती डोळ्यांसमोर नष्ट होताना काही लोक नाही बघू शकत. अशात एक चर्च या लोकांनी बांधायला काढलं. ते सरकारी जमिनीवर येतंय म्हणून लोकांनी त्याला विरोध केला आणि पोलीसांनापण सांगितलं. त्यातूनच भांडण वाढलं आणि आजची केस झाली.”

प्रांत ‘अम्यूझ’ झाले. त्यांना हे सगळं रंजीत वाटलं. पण काही बोलले नाहीत.

“आज मिशनरी येतायत, उद्या नक्षल येतील. या भागाचा दंतेवाडा किंवा कंधमाळ व्हायला वेळ लागणार नाही.”

“झालं तुमचं?” प्रांत म्हणाले, “आता जरा मला तो व्हिडीओ दाखवा बघू.”

प्रांतांनी दहा मिनिटे फास्ट फॉरवर्ड करुन तो व्हिडीओ पाहिला. काही लोकांच्या मुलाखती आणि एका अर्धवट बांधकामाचे चित्रण होते.

मोहंतीबाबू म्हणाले, “सर आम्ही एक स्टोरी बनवलीय. तुमच्या बाइटशिवाय पूर्ण होणार नाही!”
प्रांत म्हणाले, “मोहंतीबाबू, तुम्हाला माहीत आहे, मी ओल्ड फॅशन्ड बाबू आहे. माझ्या बातम्या न आलेल्या बऱ्या! माझ्या बऱ्या वाईट कामाविषयी जरुर आणा, पण माझं नाव, आणि चेहेरा आणू नका!”
“नाही नाही सर. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला बोललंच पाहिजे.”
“बरं बोलतो. पण धर्मांतरावर माझ्या नो कॉमेंट्स. आणि नक्षलवादावर पण मी काहीही बोलणार नाही. कबूल?”
“सर नुस्तं कॅमेऱ्यात दिसलात तरी बास आहे आम्हाला!”

मग बाइट द्यायच्या आधी प्रांतांनी त्यांना नक्षलवादावर आणि कंधमाळ प्रकरणावर एक छोटंसं लेक्चर दिलं, जेणेकरुन
बाइटचा हट्टाग्रह जरा शांत होईल!

(क्रमशः)

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

कस्टोडियल डेथ -भाग २ (प्रांतांच्या गोष्टी - ३)

एकच्या सुमाराला कोर्ट संपले. प्रांतांनी पोस्टमार्टेम संपल्याची खात्री करून घेतली. त्याचं व्हिडीओ शूटींग झालंय का ते विचारलं. मग तहसीलदारांना प्रोग्रेस विचारला. तर मयताची पत्नी, आई आणि बहीण ठाण्यात येऊन रडत बसल्या होत्या. बॉडी ताब्यात घेण्यासाठी तयार नव्हत्या.
पोलीसांचं त्या ऐकणं शक्यच नव्हतं. रारुआं भाग प्रांतांना ठाऊक होता. कुणी स्थानिक नेतापण धड नव्हता की ज्याच्या मार्फत काही बोलता येईल. प्रांत लगेच रारुआंला निघाले. जाताना घरातून एस्पींसाठी इडल्यांचा डबा घ्यायला विसरले नाहीत. रात्रभर माणूस जागा होता. प्रवासात होता. टेन्शनमध्ये होता. काहीच खाल्लं नसेल. तिथं रारुआं ठाण्यातही काही खायची सोय झाली नसेल या गोंधळात. त्यांच्या पत्नीचे कल्याणीला, प्रांतांच्या पत्नीला फोन येत होते, की हा माणूस काल सकाळी जो घराबाहेर पडलाय, ते आज पहाटे दोन तासांसाठी घरी येऊन गेलाय. कुठे आहे, जेवलाय का, काही बातमी आहे का? फोनही लागत नाहीये. कल्याणीला ही गोष्ट माहीत होतीच. तिने एस्पीच्या पत्नीला दिलासा दिला आणि इडल्यांचा डबा भरून प्रांतांच्या हाती दिला.
खड्ड्यांच्या रस्त्यातून धक्के खात प्रांत दुपारी अडीच वाजता रारुआंला पोचले. रस्त्यात पीएसओनं त्यांना डुबुणा गाव दाखवले. हेच त्या मयताचं गाव. इथून ठाणं दोन किमीवर. गावही रस्त्यापासून बरंच आत होतं. रस्त्याकडेला शाल वृक्षांची गर्द राई होती. या भागातलं टिपिकल आदिवासी गाव. प्रांत ठाण्याजवळ पोचले. ठाण्यापासून काही अंतरावर गर्दी जमा झालेली होती. पण रस्ता मोकळा होता. ठाण्याचं गेट बंद होतं. फोर्स होता.
एस्पी व्हरांड्यातच बसले होते. ऍडिशनल एस्पी होते. आवारात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पहिबाबू एका मोठमोठ्यानं रडणार्या बाईची समजूत काढत होते. तिथे न थांबता प्रांत एस्पींकडे गेले. एस्पी त्यांना घेऊन आत गेले. आय आय सी च्या खुर्चीत बसून एस्पी प्रांतांना सांगू लागले, “अजित, हा पहि कॉंग्रेसचा आहे. आत्ता हा या मयताच्या बहिणीला समजावतोय. हे नाटक आज सकाळपासून चालले आहे. सकाळी बीजेडी ची माणसं समजाऊन गेली. हे लोक तयार झाले. आम्ही मयताच्या मेव्हण्याला गाडीतून सबडिव्हिजन हॉस्पीटलला बॉडी ताब्यात घ्यायला पाठवणार तेवढ्यात पुन्हा जमाव जमा झाला आणि दगडफेक केली. प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून मला इथे यावं लागलं. मग ही कॉंग्रेसची माणसं आलीत. आता मी बीजेपीची वाट बघतोय! पुन्हा गावातली इतर टाउटर मंडळी आहेतच. प्रत्येकाला पैसे हवेत, क्रेडिट हवंय. पुन्हा ज्यांच्यावर इथे जुन्या केसेस आहेत ते दंगा करायला उत्सुक आहेत.”
प्रांतांनी अगोदर एस्पींना इडल्या खाऊ घातल्या. मग ते बाहेर गेले. पहिबाबू गेले होते. पण बायका तिथेच होत्या. प्रांतांनी मयताच्या मेव्हण्याला बोलावले. त्यांनी त्याला समजावले. असं जाग्यावर कॉम्पेन्सेशन मिळत नसतं. चौकशी होईल. इत्यादि. तो निमूटपणे ऐकून घेत होता. पण त्याची बहीण मोठमोठ्यानं ओरडत प्रश्न विचारत होती – माझ्या भावाला पोलीसांनी धरून आणला, गुरासारखं मारलं आणि त्याचा जीव घेतला. इतर काही मंडळी सुरात सूर मिसळून म्हणत होती – ज्या पोलीसानं त्याला अटक केली त्याला बोलवा, त्याची वर्दी काढा, त्याला आम्ही चपलीनं मारणार.
प्रांतांनी क्षणभर विचार केला. पोलीस डिफेन्सिव्ह आहेत. आपल्याला असायची गरज नाही. शिवाय प्रांतांना एक गोष्ट एव्हाना लक्षात आलेली होती, इथल्या लोकांना भूक सहन होत नसे. ट्रेनिंग देणारे कलेक्टर त्यांना सांगत, ‘अजित, लोक घेराव घालून, रस्ता अडवून बसले, की त्यांच्याशी चांगली दुपार होईपर्यंत बोलायला जायचंच नाही. भुकेची वेळ झाली की तेच मग तडजोड करायला लागतात.’ ही वेळ लोकांना हाकलायला योग्य होती. लोकंही पडत्या फळाची आज्ञा घेऊन पळाले असते.
ते म्हणाले, “अय बाबू, टिक्के रुह. तुमे कण मॅजिस्ट्रेट की? धर्मावतार? हं? हा जो माणूस मेलाय, तो कोण तुझा?”“अग्यां, गाववाला.”“मग जामीन द्यायला आला नाहीस काल ते?”“……”“दवाखान्यात इन्क्वेस्ट, पोस्टमार्टेमच्यावेळी गाववाल्यासाठी थांबायला कुणाला वेळ नव्हता ते?”“…..”“नीट ऐका सगळेजण. जो मेलाय तो तुमचा कुणी नव्हता. तो माझा माणूस होता. हे पोलीस माझे कुणी पाहुणे नाहीत. मी तुमच्यासाठीच आहे. पण म्हणून पोलीसांचे कपडे काढायची भाषा मी ऐकून घेणार नाही. असलं बोलायचं असेल तर चालायला लागा इथून.”“नाही अग्यां, आम्हाला न्याय पाहिजे. त्याशिवाय आम्ही जाणार नाही.”“जी चौकशी असेल ती मी करणार आहे. तुम्ही नाही. समजलं? तुम्ही इथे बडबड करून काही होणार नाही. चौकशीत तुम्ही मला तुम्हाला काय वाटतं ते सांगू शकता. आत्ता निघा.”मग मेव्हणा सगळ्या माणसांना घेऊन गेटबाहेर गेला. प्रांतांनी त्याला परत बोलावलं. कसंबसं त्या बायकांना समजाऊन प्रांतांनी त्यांना राजी केलं आणि मेव्हण्याला पोलीसांच्या गाडीतून हॉस्पीटलकडे रवाना केलं.
मग प्रांत आणि एस्पी थोडे रिलॅक्स झाले. अजून साधारण तीन तासांनी बॉडी गावात येणार. अंधार पडायच्या आत अंत्यसंस्कार झाले पाहिजेत. नाहीतर पुन्हा सकाळपर्यंत जर थांबलो तर सकाळी फ्रेश झालेली टाउटर मंडळी उद्याचा सगळा दिवस वाया घालवतील. एस्पींनी ताबडतोब रिझर्व्ह ऑफिसला फोन केला आणि अंत्यसंस्कारासाठी खड्डा खणण्यासाठी चार मजूर बोलावून घेतले.गावातून सहकार्याची काहीच अपेक्षा नव्हती.
प्रांत IAS आणि एस्पी IPS. लगतच्याच बॅचमधले असल्यामुळे दोघांमध्ये अनौपचारिक नातं होतं. प्रांतांनी एस्पींना खरी गोष्ट विचारली.
एस्पी म्हणाले, “अरे, ही खरंच आत्महत्या आहे. पोलीस म्हणलं की लोकांना पहिलं मनात येतं की ही ‘मारणारी’ माणसं. झालं असं, की काल संध्याकाळी हा माणूस, घासीराम मुर्मू, ठाकूरगढला जाणार्या रस्त्यावर उभा राहून गाड्या अडवून पैसे गोळा करत होता. ट्रकच नव्हे, तर चार चाकी पण. मग एक बलेरो गाडी ठाण्यात आली आणि लोकांनी ओआयसीला हे सांगीतलं. ओआयसी दोन होमगार्डांना घेऊन पोलीस जीपमध्ये बसून तिथं गेला आणि घासीरामला रस्त्यावर उभा असलेला पाहिलं. तिथल्या दुकानदारांनी पोलीसांना सांगीतलं की हा प्यायलेला आहे आणि रस्त्यावर गाड्या अडवतोय. एखाद्या ट्रकाखाली येऊन मरायचा. याला घेऊन जावा. मग त्याला धरून आणला. एका दुकानदाराकडून तक्रार पण लिहून घेतली. त्याला आणून इथं व्हरांड्यात बसवलं आणि ओआयसी खुर्चीत बसून त्याचा क्लास घेऊ लागला. पण तो अर्धवट नशेत होता. वाद घालू लागला. दोन-तीन वेळा पळून जायचा प्रयत्न केला. तोपर्यंत एक तास होऊन गेला होता. त्याच्या घरचं किंवा त्याचा कुणी मित्र, कुणीही इकडं फिरकलं नव्हतं. त्याला अटक केलेली होती. मग यांनी त्याला टाकला हाजत मध्ये. हाजतमध्ये टाकताना आम्ही त्याच्या अंगावर फक्त एक चड्डी ठेवायला पाहिजे, कपड्यांनी फास वगैरे लावून घेऊ नये म्हणून. पण हे मालक फक्त लुंगी नेसून होते. आत मोकळेच. त्याला मग लुंगीवरच आत टाकला. थोड्या वेळाने अंधार पडला. अजून थोड्या वेळाने लाइट गेली. दोघेजण होमगार्ड इथे हाजतसमोर बसून होते. ते बाहेर व्हरांड्यात गेले. हाजतमध्ये, तू बघू शकतोस, वर उंचावर हवा येण्यासाठी एक झरोका आहे. या घासीरामाने संडासच्या तीन फुटी आडोशावर चढून त्या झरोक्याच्या गजाला धोतर बांधले आणि फास लावून उडी मारली.”
प्रांत उठले आणि हाजतचा कुंई कुंई आवाज करणारा भला मोठा लोखंडी कोयंडा काढला. आत जाऊन त्या भिंतीवर चढून झरोक्यापर्यंत हात जातोय का ते पाहिलं. असं घडणं शक्य होतं.
एस्पी म्हणाले, “अजित, इथले पोलीस हे स्थानिक आहेत. हे लोक मूर्ख आहेत, पण क्रूर नाहीत. जवळच्या गावातल्या तोंडओळखीच्या माणसाला असं जिवे मारणार नाहीत. मारायची गरजच नव्हती रे. काही वदवून घ्यायचं नव्हतं. शिवाय पोलीस पोलीस म्हणजे कोण? एक ए एस आय आणि एक कॉन्स्टेबल. बाकी दोन होमगार्ड. हे लोक असं मारण्याचं अंगमेहनतीचं काम करतील असं वाटत नाही. आणि समजा त्यांचं त्या माणसाशी काही वैर असेल, त्यांना त्याला मारायचंच असेल, तर इथे आणून त्याला मारून स्वत:साठी कशाला खड्डा खणून ठेवतील?”
प्रांतांनी वाद घातला नाही. एकदा या पोलीसांना मूर्ख म्हटल्यावर ही मूर्ख माणसे काहीही करू शकतात. हाजतमध्ये मारुही शकतात. पण वाद घातला नाही. लक्ष देऊन ते एस्पींच्या शब्दांमागचे शब्द टिपत होते. त्यांच्या दृष्टीने दोनच गोष्टी महत्त्वाच्या होत्या – लवकरात लवकर अंत्यसंस्कार, आणि मॅजिस्टेरियल इन्क्वायरी. इन्क्वेस्ट आणि पोस्टमार्टेममध्येच अर्धं सत्य बाहेर येणार होतं. प्रांतांनी तहसीलदारांना डुबुणा गावात पोलीसांसोबत धाडून दिले. थोडी शहाणीसुरती माणसं जमा करून अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी.
एस्पी म्हणाले, “अजित, तुला काय वाटतं हे नाटक कशासाठी चाललं आहे? हा सगळा पैशांचा खेळ आहे. आमची पन्नास हजाराची तयारी आहे.”प्रांत चमकले. म्हणाले, “सर हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं.”“तुला काय अपेक्षित आहे? हा दंगा वाढत जावा, कधीच न थांबावा? वरिष्ठांनी आमचा बकरा बनवावा?”“तसं नाही. एकतर हे पैसे आणणार कुठून? दुसरं. का द्यायचे? देऊन लोकांना अशा सवयी लावायच्या का?”“ही तर सुरुवात आहे. अजून कुठे कुठे किती द्यावे लागतील कुणास ठाऊक! आणि सवयी लावणारे आपण कोण? हे आहे हे असं आहे. असं का आहे याचा विचार करणं वेगळं आणि काम करणं वेगळं. आपण काम करतोय. असलं चिंतन वगैरे करत बसलो तर काम कोण करणार?”“सुखी आहात सर. विचार करत नाही तुम्ही.”“सुखी! हे पैशाचं तर फार मोठं नाटक आहे बाबा. मी पैसे खात नाही. पण याचा अर्थ असा नाही की माझ्याखालचं दुसरं कुणी खात नाही, किंवा मला कुणाला कधी द्यावे लागणार नाहीत. पैसे न खाता खात्यात राहणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. यू आर पर्सोना नॉन ग्राटा. संधी मिळाली की तुम्हाला अडचणीत पकडतात. आता हीच गोष्ट बघ. एरवी एस्पी या पैसे खाणाऱ्या लोकांच्या पठडीतला असता तर त्याला इथं माझ्यासारखं येऊन बसावं लागलं नसतं. या लोकांनी परस्पर पैसे वगैरे देऊन एव्हाना मिटवून टाकलं असतं. पण आता ही लोकं माझी परीक्षा बघतायत. यांना मी माझ्या तोंडानं सांगीतलेलं हवंय की पैसे द्या. बघ कसे साळसूद होऊन बसलेत. पैसे न देता या ‘ऑनेस्ट’ माणसाला परिस्थिती सांभाळता आली तर ठीकच. नाही आली तरी कुठल्या तोंडानं पैसे मागतोय बघू.”
मोठे मासे छोटे मासे. प्रांतांच्या कानात आवाज झाला.
एस्पी म्हणाले, “काय रे बोलत नाहीस. ही नोकरी अवघड आहे बाबा. कुठे फसलास बिसलास तर बाहेर निघायला किती वेळ लागेल आणि किती खर्च येईल ते समजणार नाही. न्यायानं लढाई करायची म्हणालास तरी न्याय स्वस्त नाही. अडीच तीन लाख खास अशा कॉन्टिन्जन्सीसाठी बाजूला ठेवावे लागतात.”
प्रांत गप्प बसले. आपली तीन लाखाची बचत व्हायला किती वर्षे लागतील याचं गणित हबकलेल्या मनानं एव्हाना करायला सुरुवात केली होती.
पाच वाजेपर्यंत बॉडीची बातमी नाही म्हणता प्रांत आणि एस्पी चिंतेत पडले. तेवढ्यात तहसीलदारांचा फोन आला. “सर लोकांनी बॉडी आणणारा टेम्पो इथे गावाजवळ रस्त्यावरच अडवलाय. पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जावा म्हणतायत. पोलीस त्याचं काय करायचं ते करू देत म्हणतायत.” एस्पींनी ऍडिशनल एस्पींना तिकडे पाठवले. प्रांत म्हणाले मीच जातो .
प्रांत घटनास्थळी गेले. रस्त्यात टेम्पो थांबला होता. बाजूला शाल वृक्षांच्या झाडीमध्ये लोकांचा जमाव पोलीसांशी हुज्जत घालत होता. रस्त्यावर थोड्या अंतरावर पोलीसांची जाळ्या लावलेली व्हॅन उभी होती. त्या व्हॅनच्या कडेने सगळे पोलीस शिपाई उभे होते. हळूहळू अंधार पडू लागला होता. प्रांत त्या गर्दीत शिरले. तहसीलदारांना म्हणाले, हे असं समोर येईल त्याच्या तोंडाला लागू नका. चार पाच म्होरके आणि मृताचे नातेवाईक यांना बाजूला घ्या. बरं म्हणून तहसीलदार गेले. प्रांत ऍडीशनल एस्पींना घेऊन जंगलातून बाहेर रस्त्यावर येऊन थांबले.
ऍडीशनल एस्पी म्हणाले, “सर, हा प्रॉब्लेम असा सुटणार नाही. तुम्ही बोलून काही होणार नाही.” प्रांत म्हणाले, “हं. बघूया.”
गावकरी चार पाच गटांत विभागले गेले होते आणि सगळे एकाच वेळी बोलत होते. त्यातल्याच एका गटापुढे तहसीलदार उभे राहून त्यांच्या स्टाईलमध्ये चर्चमध्ये सर्मन दिल्याप्रमाणे काहीतरी बोलत होते. कुणीच ते ऐकत नव्हतं. त्याचवेळी त्यांच्यासमोर उभी असलेली चार पाच टाळकी काहीतरी बडबड करत होती. प्रांत हळूच तहसीलदारांच्या मागे जाऊन उभे राहिले. त्यांना एवढंच समजलं, की काही लोक म्हणतायत बॉडी ठाण्याला न्या. काही लोक म्हणतायत आम्ही ठाण्यातून घेतो. काही लोक म्हणतायत काहीही करा. काही लोक म्हणतायत आम्हाला कुणीच काही सांगीतलं नाही, पोलीसांनी त्याला पकडला, मारला, दवाखान्यात नेला, परत आणला; मग आत्ता कशाला विचारायला आलाय? ही सर्व मंडळी प्यायलेली असल्याचं प्रांतांच्या लक्षात आलं. कुणाशीच बोलून काहीच उपयोग नव्हता. प्रत्येक माणसाची स्वत:ची अशी एक जाहीर सभा चालली होती. एव्हाना अंधार पडलेला होता. इथे लाईटही नव्हती. कोण बोलतंय, प्रांत कोण, पोलीस कोण, पत्रकार कोण काहीच समजत नव्हतं. प्रांत पुन्हा मागे फिरले आणि आपल्या गाडीजवळ येऊन उभे राहिले.
ऍडीशनल एस्पी त्यांच्या कानाला लागत म्हणाले, “सर त्या मयताच्या मेव्हण्याला पाहिलं का?” प्रांत चमकले. “अरे हो. कुठाय तो? धरा त्याला. तोच गेला होता ना बॉडी आणायला? त्याला घेऊन जाऊ आणि उरकून टाकू.” ऍडीशनल एस्पी समजूतदारपणे हसले. म्हणाले, “सर तो गेला पन्नास हजार घेऊन. म्हणून तर हे बाकीचे लोक चिडलेत त्याच्यावर. हे उपाशीच. आता त्याला हे लोक गद्दार म्हणतायत. तो कुठला येतो आता. आम्ही यातल्या दहा वीस जणांना हजार हजार रुपये देऊन कटवतो.” प्रांतांनी मनातल्या मनात त्यांना वंदन केलं. म्हणाले, “या पैसे देण्याला काही अंत नाही. या लोकांनी बॉडी घेतली ठीक. नाहीतर सरळ आपण मॉर्गमध्ये घेऊन जाऊ. उद्या अंत्यसंस्कार करू. असंही त्या मेव्हण्यानं कागदावर बॉडी स्वीकारली आहेच.”
तेवढ्यात काही लोकांचा घोळका प्रांतांजवळ आला. पांढरे कपडे घातलेला एक दाढीधारी ठेंगणा माणूस प्रांतांना हात जोडून नमस्कार म्हणाला. प्रांतांनी पण हात जोडून नमस्कार परत केला.
“सर मी अमुक अमुक इथला माजी आमदार अमुक अमुक पक्षाचा. हे पोलीस स्टेशन इथं व्हावं म्हणून मीच प्रयत्न केले होते… ब्ला… ब्ला.”याच माणसाला आपण आज दुपारी आलो तेंव्हा ठाण्याच्या बाहेर पडताना पाहिले होते, प्रांतांना आठवले. अजून एक टाउटर!“काय आमदारसाहेब एवढं एक छोटंसं गाव तुमचा शब्द मानत नाही?”“तसं नाही अग्यां, लोकं चिडलीत. आपण जरा हुशारीनं काम घेऊया. आपण असं करू, ही बॉडी त्या पलीकडच्या रस्त्यानं वळसा घालून आणूया.”“त्यानं काय होईल?”“लोक जरा शांत होतील.”“कसं काय?”“त्या वाटेवर पोलीस स्टेशन आहे. लोकांचं पण समाधान की बॉडी स्टेशनपासून घेऊन आले, आपला पण प्रश्न सुटेल.”प्रांतांनी शांत शब्दांत माजी आमदारसाहेबांचा मुत्सद्दीपणा मोडीत काढला. तिथून निघून परत रारुआं ठाण्यात आले.
ठाण्यात आल्या आल्या प्रांत एस्पींना म्हणाले, “आपल्यापुढे पर्याय दोन. एक, गाववाल्यांची पर्वा न करता आज रात्री दफन उरकायचं. दोन, आज रात्री गावात आपली डिस्ट्रिक्ट इंटेलिजन्सची माणसं सोडायची आणि गावातला एक तरी गट आपल्या बाजूला करुन घ्यायचा.”एस्पी म्हणाले, “पर्याय दुसरा. गाववाल्यांची पर्वा एवढ्यासाठी करायची की आपल्या विरोधात जाईल अशी एकही गोष्ट ठेवायची नाही. आपली माणसं ऑलरेडी गावात गेलेली आहेत.”प्रांतांनी ताबडतोब बीडीओंना फोन लावला. सरपंच, ग्रामसेवकांचा पत्ता नव्हता. त्यांना ताबडतोब दुसऱ्या दिवशी पहाटे ठाण्यात यायला सांगीतलं. बीडीओंना सांगीतलं, ब्लॉकमध्ये कामं घेणारा या भागातला कॉंट्रॅक्टर धरुन आणा. त्याच्या शब्दात असणारी काही माणसं तरी या भागात असतीलच.
पोलीस बंदोबस्त व्यवस्थित असल्याची खात्री करून एस्पी आणि प्रांत रात्री बारा वाजता आपापल्या घरी निघून गेले.
दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजताच प्रांत घरातून निघाले. डुबुणाजवळ रात्री रस्त्यावरच आडवा झालेला फोर्स एव्हाना जागा होऊन नित्यकर्मं आवरण्यासाठी क्रमाक्रमाने ठाण्याच्या बराककडे चालला होता. ठाण्यात पोचल्यावर आपण उगाचच एवढ्या लवकर आलो असं प्रांतांना वाटलं. ते आपले शांतपणे आत जाऊन ध्यान लाऊन बसले.
सात वाजता एस्पी पोचले. प्रांतांनी सरपंच आणि ग्रामसेवकांना पाचारले. थोड्या वेळाने एक बाई आणि दोन पुरुष बुजत बुजत ठाण्यात आले. बाई सरपंच होत्या. एकजण ग्रामसेवक आणि एकजण सरपंच-पती. प्रांतांनी त्यांना बसतं केलं आणि परिस्थिती सांगीतली. ही मंडळी कसलीच मदत करु शकणार नाहीत हे त्यांनी दोनच मिनिटांत ताडलं. मग त्यांनी सांगीतलं हा मृतदेह स्वीकारा. ग्रामपंचायतीचं कर्तव्य आहे, बेवारस शवांची व्यवस्था लावणं. सरपंच बाई घाबरुन गेल्या होत्या. ग्रामसेवकपण टाळाटाळ करु लागला. प्रांतांनी त्यांना सुरक्षेचं आश्वासन दिलं. तरीही फायदा नाही म्हणल्यावर प्रांत म्हणाले, “तुम्हाला जीव जाईल अशी भीति वाटतेय म्हणून नकार देताय. पण त्या नादात तुमची नोकरी जातेय त्याचं काय?” सरपंचांना म्हणाले, “मॅडम, तुम्ही पुन्हा कधीच निवडणुकीला उभं राहू शकणार नाही याची व्यवस्था मी करीन.” दोघांनाही कापरं भरलं होतं. एका बाजूला गावकऱ्यांची भीति तर दुसरीकडे प्रांतांचा दम. प्रांतांनाच दया आली. ते म्हणाले, “गुपचुप एक कागद करा आणि फाइलला लाऊन ठेवा. आम्हीच करतो सगळं. तुम्ही फक्त संस्काराला हजर रहा. तेवढं तरी जमेल ना?” होकारार्थी माना हलवून मंडळी निघून गेली.
एस्पी म्हणाले, “अजित, लोक आज पुन्हा फ्रेश झालेत भांडायला. आपण आज कोणत्याही परिस्थितीत एक गट बाजूला करून घेतलाच पाहिजे. ही या भागातली शांती कमिटीची माणसं पण कालपासून प्रयत्न करतायत.”
अकरा वाजत आले होते. गेले दोन दिवस जिल्ह्यातला बराचसा फोर्स इथं अडकून पडला होता. दरम्यान हुंडुळा ठाण्याच्या आयआयसीने खासदारांना गाठून त्यांना गावाकडे आणण्याची व्यवस्था केली होती. खासदार गावातल्या लोकांशी बोलत असल्याचे समजताच प्रांत तडक तिकडे निघाले. खासदार स्वत: आदिवासीच होते. त्यांचं वक्तृत्त्व विशेष नव्हतं. त्यांनाच गावकरी गुंडाळून ठेवण्याची शक्यता अधिक होती. प्रांत तिथे पोचल्यावर खासदार त्यांना बाजूला घेऊन म्हणाले, “माझी माणसं गावात गेलीत लोकांना बोलावून आणायला. आपण थांबू इथेच.” प्रांत त्यांच्याभोवती जमा झालेल्या कोंडाळ्याकडे बघत म्हणाले, “मग ही जनता कुठली?” खासदार म्हणाले, “हे लोक म्हणतायत आम्ही शेजारच्या गावचे. या पंचायतीचे नाही.” प्रांतांना संताप आला. म्हणाले, “काय रे, लग्नातलं जेवायला चालते ना शेजारची पंचायत? मग स्मशानात जायला चालत नाही?” लोक चुप्प. हुंडुळा आय आय सी प्रांतांच्या कानाला लागत म्हणाला, “सर यात काही माणसं आहेत गावातली, पण ती हळूच मागून पुटपुटतायत की बघूया कोण घेतो बॉडी!” प्रांतांनी खासदारांना बाजूला घेतले आणि म्हणाले, “काय म्हणाली ही लोकं तुम्हाला?” खासदार म्हणाले, “काही नाही, त्या विधवेला थोडं अधिक कॉम्पेन्सेशन – पन्नास ऐवजी साठ हजार, आणि एखादी नोकरी.” प्रांत त्यांना म्हणाले, “सर, आम्ही सांभाळतो आता. आपण कष्ट घेतले त्याबद्दल थॅंक्स! गावातून कुणीही येणार नाही आपलं बोलणं ऐकून घ्यायला.” खासदारांनाही अंदाज आला होताच. लोकांवर दबाव टाकू शकत नाही हे पण त्यांच्या लक्षात आलं होतं. ते निघून गेले.
बॉडीचा दर्प सुटला होता. पोलीस नाकाला रुमाल बांधून उभे होते. प्रांतांनी मेडीकल ऑफिसरना फोन लावला आणि ताबडतोब एक सर्टिफिकीट बनवायला सांगीतले – शव डिकॉम्पोज होऊ लागलेले आहे, त्यामुळे यापुढे ते असेच ठेवणे हितकारक नाही.
कलेक्टरांचा फोन आला. “काय चाललंय अजित?”“मॅडम आम्ही बॉडी मॉर्गमध्ये हलवतोय. एस्पींशी बोलतो आणि फायनल करतो.”“गुड. ताबडतोब करा. मला तू आणि एस्पी एक तासाच्या आत इथे हवे आहात. रेल्वेची लोकं येऊन थांबलीत. तुमच्यासाठी मी टास्क फोर्स ची मीटिंग थांबवलीय. तहसीलदाराला चार्ज दे आणि सुट तिथून.”
*******
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता जिल्ह्याच्या ठिकाणी शे पाचशे उदबत्त्यांच्या धुरामध्ये घासीरामच्या दुर्दैवी देहाला मोजक्या गावकऱ्यांनी पोलीसांच्या मदतीने मूठमाती दिली.
*******