बुधवार, २३ फेब्रुवारी, २०११

प्रिय विनील,

श्रावण मोडक या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एका सुजाण नागरिकाने खालील लेखवजा प्रकटन/ खुले पत्र मिसळपाव डॉट कॉम तसेच अन्य संस्थळांवर प्रकाशित केले आहे. त्यांच्या सौजन्याने हे इथे पुनर्प्रकाशित करीत आहे. वाचकांनी हे आपापल्या ब्लॉगवर (विनाबदल) प्रकाशित करायला मूळ लेखकाची काही हरकत नाही. याचा जमेल तेवढा प्रसार करावा हे आवाहन. आपल्या पाठिंब्याची विनीलसारख्या अधिकारी-कार्यकर्त्यांना गरज आहे.

- आळश्यांचा राजा.
***********************************************************************************************************
ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र. त्यांच्या परवानगीनेच येथे प्रसिद्ध करतो आहे.


------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रिय विनील,

परवा मध्यरात्री एका जिल्हाधिकारी मित्राचा फोन आल्यापासून झोप उडालीय. म्हणाले, ‘माओवाद्यांनी विनीलला डिटेन केलंय’. फोन कलेक्टरांचाच असल्यामुळे बातमीची खातरजमा करण्याचा प्रश्नच नव्हता. मग निष्फळ फोनाफोनी सुरु झाली. काय झालंय हे समजून घेण्यासाठी फक्त. तपशील समजले. डिटेन नव्हे तर अपहरणच. पण उपयोग काय?

रात्री दोन वाजता एका मित्र एसपींचा (पोलीस अधीक्षक) फोन आला. माझ्याकडून त्यांना तपशील पाहिजे होते. मी काय कप्पाळ तपशील देणार? ते पूर्वी मलकनगिरीत एसपी होते. “कशाला असं सिक्युरिटी न घेता नक्षल भागात फिरता रे?” कळवळ्याने ते म्हणाले. त्यांची अस्वस्थता माझ्या लक्षात आली. तुझ्यावर सगळेच पोलीस वैतागले असले तर आश्चर्य नाही रे. तुझ्यावर आख्खी एस्टॅब्लिशमेंटच वैतागली असणार. अस्वस्थ करण्याची शक्ती घेऊनच जन्माला आलायस.

तू मयूरभंजमध्ये आयएएस प्रोबेशनर असतानाच एखाद्या कार्यकर्त्यासारखं स्वत:ला झोकून दिलं होतंस. मोटरसायकल घेऊन सिमलीपालच्या जंगलात वेळी-अवेळी एकटाच जायचास. आदिवासी पाड्यांवर फिरायचास. त्यांना जवळून बघायचास. त्यांच्यासाठी योजनांमध्ये, नियमांमध्ये अपवाद करण्यासाठी कलेक्टरांशी बोलायचास. आम्हाला सिमलीपाल दोनच गोष्टींसाठी माहीत होतं – पर्यटन स्थळ, आणि नंतर माओवाद्यांचा अड्डा. तू याच्या पलीकडे गेला होतास. वयाच्या पंचविशीतच. ही समज घेऊनच तू जन्माला आला होतास.

तुला एका ठिकाणी पोस्टिंग मिळालं, आणि त्याचवेळी कंधमाळमध्ये धार्मिक दंगली सुरु झाल्या. या दंगलींना आदिवासी विरुद्ध दलित असा कुठेही न सापडणारा रंग होता. सरकारला एक कलेक्टर, एक एस्पी आणि एक सबकलेक्टर हवा होता. टू फिक्स द थिंग. आणि चारच महिन्यांत तुला डिस्टर्ब करुन कंधमाळला पाठवला. तुम्ही तिघांनी तिथे अजोड कामगिरी केलीत. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचा पूर्वग्रहही तुमचे काम झाकोळू शकला नाही.

मलकनगिरी जिल्हाधिकारी पदासाठी तुझी निवड झाली तेंव्हा बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले. एवढे चांगले काम करणाऱ्याला ही शिक्षा? हाच अनेकांचा प्रश्न होता. मलकनगिरीमध्ये कुणी पाय ठेऊ धजत नाही. नक्षलवाद्यांची अघोषित राजधानी. पण सुजाण मुख्यमंत्री इथे कर्तव्यकठोर अधिकारीच पाठवतात हे फार थोड्या जणांच्या लक्षात येते. तुझ्याअगोदर इथे नितीन जावळेंनी चांगल्या कामांचा पायंडा पाडून ठेवलेला होताच. तुझे ग्राऊंड बऱ्यापैकी तयार होते. तू त्यावर सुंदर बाग फुलवलीस. मलकनगिरीत आजमितीस तू जेमतेम एक वर्ष पूर्ण केलेस. लाल दिव्याच्या गाडीचे तुला कधीच आकर्षण नव्हते. मलकनगिरीत त्याची गरजही नव्हती तुला. नाडलेल्या आदिवासींना मदत करण्यासाठी तुला कशाचीच गरज नव्हती. मनासारखे काम करता येण्यासाठी तुला फक्त स्वातंत्र्य आणि एक यंत्रणा हवी होती. ती तुला मिळाली.

तुझ्या मनात या आदिवासींसाठी इतके प्रेम आहे की तुला भीती म्हणून काय ती नाहीच. या भागात दुसरा एखादा अधिकारी काय करेल? एकतर बाहेर पडायचे नाही. पडले तर हेवी सिक्युरिटी असल्याशिवाय नाही. आर ओ पी (रोड ओपनिंग पार्टी) आधी पुढे जाणार. लॅण्डमाइन्स तपासणार. साग्रसंगीत उपचार होणार. अर्धा दिवस त्यातच जाणार. मग आपलं भोज्जाला शिवून अधिकृत भेट उरकून अंधार पडायच्या आत आपल्या सुरक्षित ठिकाणी परत यायचं. पण तुझी रीतच न्यारी. तू आणि तुझा ड्रायव्हर. पीएसओ नाही, आरओपी नाही. हत्यार तर नाहीच नाही. जिथंपर्यंत गाडी जाईल तिथंपर्यंत जायचं. जिथं रस्ता संपेल तिथं तुला घ्यायला एखादा तहसीलदार, एखादा बीडीओ, एखादा इंजिनियर आलेला असायचा. मोटरसायकल घेऊन किंवा चालत. जेवण त्यांच्यासोबतच. सगळं एकदम शिवाजी महाराज स्टाइल. लोकांच्यात बसायचं. बोलायचं. आणि जे करता येण्यासारखं असेल ते लगेच करायचं. जे करता येण्यासारखं नाही, ते त्यांना समजावून सांगायचं.

हे एवढं आदिवासींसाठी खूप होतं. तू त्यांच्यासाठी वनवासात आलेला रामच जणू.

आदिवासी गांजलेले. एका बाजूने नक्षल. दुसऱ्या बाजूने पोलीस, सीआरपी. दोन्हीकडून मार. खायची मारामार. नक्षलवाद म्हणजे काय हे त्यांना कुठून समजणार? नक्षलींनी आदिवासींची पोथी बरोबर वाचलेली होती. त्यांची मनं जिंकायची त्यांना गरजच नव्हती. जे त्यांना जरा बरे वाटत, त्यांना ‘रिक्रुट’ करीत. बाकीच्यांचा काही फरक पडत नसे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी स्वत: त्यांच्या पाड्यावर येत असेल तर त्यांना तुझ्यात देव दिसल्यास नवल नाही.

हे आम्हाला आज समजलं. तुला नक्षलवाद्यांनी पकडून नेल्यावर ज्या गावातून तुला त्यांनी नेलं, त्याच गावातल्या आदिवासींनी उत्स्फूर्त मोर्चे काढले, तुला सोडावा म्हणून. सगळं मलकनगिरी बंद आहे आज. कुणीही न सांगता. तू याआधी काम केलेला कंधमाळ जिल्हाही बंद आहे. तोही तसाच. उत्स्फूर्तपणे. ज्या आदिवासींसाठी काम करत असल्याचा दावा नक्षल करतात, त्याच आदिवासींनी नक्षलांना ठणकावून सांगितले, आमच्या कल्याणाची काळजी असेल, तर अगोदर कलेक्टरांना सोडा. आम्हाला तेंव्हा कळलं, तू काय आणि कसं काम करतोयस ते. आज सगळ्या राज्यात निदर्शने चालू आहेत. कलेक्टरसाठी नाही, तर विनीलसाठी.

एक फार मोठा विरोधाभास आज लोकांना पहायला मिळाला.

कुडमुल्गुमा नावाच्या दुर्गम ब्लॉकमध्ये तू गेला होतास. जनसंपर्क मेळाव्यासाठी. तिथं जाणं सोपंही नाही, आणि शहाणपणाचंही नाही. रस्त्या-रस्त्यावर सुरुंग लागलेले असतात. तू गेलास ते गाव तर भलतंच कुप्रसिद्ध. हे कुडमुल्गुमा त्याच भयावह बालिमेडा जलाशयाच्या जवळ, जिथे दोन वर्षांपूर्वी जवानांनी भरलेली आख्खी बोट नक्षल्यांनी बॉंबहल्ल्याने बुडवली होती. हा ‘त्यांचा’ इलाका. पंधरा ग्रामपंचायती त्यांच्या. या भागात सरकारी माणसानं यायचं नाही. पोलीस, सीआरपी तर लांब.

तू इथे जायचास. एकदा नाही, दोनदा नाही, नेहेमी. खरं तर तू इथेच, १५१ गावांवर, कट ऑफ गावांवर, तुझं लक्ष केन्द्रित केलंस. तू जाऊ लागलास, आणि लोकांनाही वाटलं इथं काम होतंय. इथल्या लोकांनी एकदा मागणी केली, आम्हाला ब्लॉक ऑफिस लांब होतंय, तर तू थेट त्या गावांमध्ये गेलास, आणि ब्लॉक ऑफिस आठवड्यातून एक दिवस तिथे, असं खरंच चालू केलंस देखील. लोकांमध्ये जसजसा प्रिय होत गेलास, नक्षली वेट अॅण्ड वॉच करत राहिले असावेत बहुदा, तुझा आत्मविश्वास वाढत गेला. तुला सिन्सिअरली वाटत होतं, इथं सरकार पोचलं नाही म्हणून नक्षलवाद आला. आता तो घालवायचा असेल, तर सरकार तिथं गेलं पाहिजे.

विनील, ज्या दिवशी तू गेलास तो दिवस इदचा होता. सरकारी सुट्टीचा. तू सुट्टी न घेता काम करत होतास. भीतीने सुनसान ओस पडलेले रस्ते पार करून तू सिलेरू नदीच्या काठी गेलास. तिथून बोटीने नदी ओलांडून त्या गावी पोहोचलास. का, तर सरकार गावांत पोचलं पाहिजे यासाठी. शिबिर झालं. लोकांचे समाधान केलंस. वनाधिकाराचे दाखले वाटलेस. पेन्शन दिलीस. आवास योजनेचे लाभ दिलेस. मग एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तुला आग्रह केला, “सर, इथे जनतापै गावात विद्युतीकरणाचं काम बघायला चला.” आणि तू विनाविलंब गेलासही. मोटरसायकलवर. सोबत फक्त दोन ज्युनिअर इंजिनियर घेऊन. जंगलात. खोल गुहेत जणू. जिथून परत आलेली पावलं दिसत नाहीत. तुझे एकूणच स्वयंसेवी संघटनांवर भाबडे प्रेम आहे. त्या लोकांनी तुला परत पाठवलेच नाही. एका इंजिनियरला परत पाठवले – असं सांगून की, ‘आम्ही सरांची काळजी घेतो, तू जाऊन सरकारला ही चिठ्ठी दे, सांग अठ्ठेचाळीस तास, आमच्या मागण्या आणि कलेक्टरचे प्राण.’ तुझे डोळे बांधून तुला चालवत सहा जण जंगलात घेऊन गेले.

आजही तुला चालवलंच जातंय. रोज वेगळ्या ठिकाणी. जागा बदलत. का, तर तुझ्या सुटकेसाठी सारं काही पणाला लावू पाहणाऱ्या आदिवासींनाही ते शक्य होऊ नये. असं म्हणतात की, त्यांनी आता मोर्चेबांधणीही केली आहे.

विनील, तू म्हणायचास, या लोकांसाठी काम करायला मला पाठवलंय, मी ते करतोय, हे लोक मला कसा काय अपाय करतील? तुझा विश्वासघात झाला दोस्ता.

आता आज बऱ्याच जणांच्या मनात काय विचार सुरू असतील ठाऊक आहे? ऐक.

विनिल, वेड्या, तुला कल्पना आहे का तू सरकारला किती मोठ्या काळजीत टाकलंयस त्याची? आम्हाला एकाच वेळी तू उत्तम अधिकारी, प्रशासक वाटतोस, आणि त्याच वेळी अविचारी साहसी आदर्शवादी तरुणही वाटतोस. तुला काय गरज होती तिथं जायची? पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला? एकतर तिथं जायचंच नव्हतंस. किंवा गेलास तर सुरक्षेचा जामानिमा घेऊनच जायचंस. वेडा. बेजबाबदार. अदूरदर्शी. असा कसा रे कलेक्टर तू?

हे आणि असंच बऱ्याच जणांच्या मनात येत असणार याची मला कल्पना आहे. हे असले प्रसंग तर होतच असतात असंही म्हणणारे महाभाग मला भेटले आहेत. विनायक सेनांच्या मानवी अधिकारांची चिंता वाहणाऱ्यांना तुझ्या मानवी हक्कांचा विचार करावासा वाटणारच नाही, कारण तू तर जालीम सरकारी व्यवस्थेतला बाबू! सरकारचा जावई! चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला वगैरे वगैरे. तुझ्यासाठी सरकार आकाशपाताळ एक करणार याची या विचारवंतांना पक्की खात्रीच. त्यामुळे ते आपली वाफ कशाला दवडतील?

पण मला काय वाटतं सांगू? तू जिंकलायस विनील. तू हादरवून सोडलंयस या तथाकथित माओवाद्यांना. ज्यांच्या कल्याणाच्या गोष्टी ते करतात, त्या आदिवासींनीच आज त्यांना सणसणीत चपराक मारलीय, ‘आम्हाला तुम्ही नको, विनील हवाय,’ असं ठणकावून सांगून. तुला प्यादं म्हणून वापरायच्या नादात नक्षल्यांनी आपलं थडगं खणून ठेवलं. यू आर देअर नेमेसिस.

विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे. यंत्रणेचा योग्य वापर करून लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे. यंत्रणेच्या नावाने खडे फोडणारे विचारवंतही नकोत, आणि यंत्रणाच बदलायला हवी म्हणून अजून एक अन्याय्य यंत्रणा बळजबरीने माथी मारणारेही नकोत. तू हे अशा प्रकारे काम नसतंस केलं तरी तुला कुणी जाब विचारणार नव्हतं. उलट तुला सहानुभूतीच मिळाली असती, बिचारा मलकनगिरीत पोस्टिंग झालंय, याच्या कुटुंबाचं, मुलांचं कसं होणार, याच्या सॉफ्ट पोस्टिंगसाठी कुठे प्रयत्न करायला सांगूयात, इत्यादी.

तू हिरो आहेस विनील. आय ए एस आहेस म्हणून नाही. जिल्हाधिकारी आहेस म्हणून नाही. जिवाची बाजी लावून जग बदलायला निघालेला शिलेदार आहेस. केवळ स्वप्न न बघता झोकून देणारा कार्यकर्ता आहेस. म्हणूनच तू हवा आहेस आम्हाला.

तुझा वेडेपणा हवाय विनील आम्हाला. तुझ्यासारखे ‘वेडे’च नक्षलवादाच्या वेडाला मूठमाती देऊ शकतात.

आय सॅल्यूट यू, सर!

सचिन जाधव, आयएएस, ओरिसा.


सौजन्य - श्रावण मोडक.

रविवार, १३ फेब्रुवारी, २०११

दि लाइफ अ‍ॅण्ड टाइम्स ऑफ सुन्द्री कुंभार

सीआरपीएफ कमांडंट रवीन्द्र मोठा उमदा माणूस होता. थोड्याच काळात प्रांतांचा चांगला मित्र झाला होता. रविवारी सकाळी एका कार्यक्रमाला त्यांनी प्रांतांना जेंव्हा बोलावलं तेंव्हा प्रांतांनी कसला कार्यक्रम आहे याची चौकशी न करताच हो म्हणलं.
ठरल्याप्रमाणे ठीक साडेअकरा वाजता प्रांत सीआरपीएफच्या छावणीत पोचले. लष्करी थाटात आगत स्वागत झाले. एका मोठ्या शामियान्यामध्ये ग्रामीण भागातून आलेली शंभरेक तरुण मुले मुली समोर सतरंजीवर शिस्तीत बसली होती. शामियान्याच्या एका अंगाला पत्रकार तर दुसऱ्या अंगाला अधिकाऱ्यांच्या पत्नी मंडळी बसल्या होत्या. शामियान्याच्या मागच्या बाजूला सीआरपीचे काही अधिकारी आणि जवान उभे होते. समोरील बाजूला तीन मोठाले सोफे ठेवले होते. एका कोपऱ्यात एक मोठी समई आणि बाजूला एक पोडियम होते.

डीआयजी अजून पोहोचले नव्हते. रवीन्द्र आणि प्रांत कार्यक्रमाविषयी बोलू लागले. हा कार्यक्रम सीआरपीच्या सिव्हिक अ‍ॅक्शन प्लॅनचा एक भाग होता. यामध्ये नक्षलग्रस्त भागात, तसेच इतरत्र कार्यरत असणाऱ्या दलांना काही फंड दिलेला असतो. त्यातून त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या नागरी भागात लोककल्याणाची काही कामं करणं अपेक्षित असतं. फोर्सेस ना एक ‘चेहेरा’ देण्याचा एक प्रयत्न. रयतेची मनं जिंकणं हे कुठलंही युद्ध जिंकण्यासाठी अत्यावश्यक. या फण्डमधून कुणी ग्रामपंचायतींना टीव्ही देत असे, कुणी एखाद्या स्पोर्ट्स क्लबला खेळसामुग्री देत असे तर कुणी एखादा कम्युनिटी हॉल बांधायला मदत करत असे. रवीन्द्रनी थोडा वेगळा विचार केला होता. त्यांनी साठ मुले आणि साठ मुली निवडल्या. एक साधी परीक्षा घेऊन. हार्डकोर नक्षलग्रस्त गावांमधून. त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देण्यासाठी. या बॅचमध्ये ड्रायव्हिंग आणि टेलरिंगचे प्रशिक्षण मिळणार होते. टेलरिंगच्या प्रशिक्षणासोबत प्रत्येक मुलीला एकेके शिलाई मशीन पण भेट देण्यात येणार होते.

प्रांतांना ही कल्पना आवडली. त्यांनी विचारलं, हे ट्रेनिंग ठीक आहे. पण व्हॉट अबाउट एम्प्लॉयमेंट? रवीन्द्र क्षणभर गोंधळल्यासारखे वाटले. त्यांनी याचा विचार केलेला नसावा असं प्रांतांना वाटून गेलं. पण रवीन्द्र लगेच सावरून म्हणाले, फॉर दॅट आय मस्ट रिक्वेस्ट यू टू इंटरव्हीन! प्रांतांच्या मनात आलं, व्वा याला म्हणतात तयारीचा शिपाईगडी! प्रांतांनी त्यांना अन्य सरकारी योजनांची थोडक्यात कल्पना दिली आणि परिसरातील इंडस्ट्रीजसोबत या विषयावर मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅण्डिंग करण्याची कल्पना मांडली. स्वयंरोजगाराचे मॉडेल. प्लस बिझिनेस गॅरंटी.

हे असले प्रयत्न केवळ सिंबॉलिकच असतात याविषयी प्रांतांच्या मनात संदेह नव्हता. याने नक्षलवादाच्या प्रसारावर आणि कॅडरभरतीवर कितपत परिणाम होणार होता कुणास ठाऊक. पण समथिंग इज ऑलवेज बेटर दॅन नथिंग!

********

कार्यक्रम पार पडला. डीआयजी निघून गेले. ऑपरेशन्स सुरु होते. बिझी होते. प्रांत कमांडंटबरोबर थांबले. आदिवासी तरुणांसोबत बोलण्यासाठी. मुली शिलाई मशीन मिळणार म्हणून हरखल्या होत्या. बऱ्याच जणींना शिवणकाम अगोदरपासूनच येत होतं. त्या तरुणाईशी बोलताना प्रांतांना जाणवलं की यांच्यात आणि अन्य खेडुत तरुणांच्यात काहीच फरक नाही. आदिवासी आदिवासी म्हणजे काय? हे तर निव्वळ ‘कार्ड’ दिसतंय. ही मुलंही शहरात यायला, पैसे कमवायला तेवढीच उत्सुक होती. टीव्ही गावागावात पोचला होता. सगळ्यांकडे मोबाइल फोन होते. अमुक एक गोष्ट या मुलांना माहीत नाही असं म्हणणं धाडसाचं होतं.

********

डीआयजींसोबत बोलणी आटोपून एस्पी जरा उशीरानेच पोचले. रवीन्द्रने मिठी मारून धीरेन्द्रचे स्वागत केले. धीरेन्द्र एकदम जिंदादिल माणूस. टिपिकल एलिट बॅकग्राउंडचा. डून बॉय. एक भाऊ बीजिंगमध्ये वकिलातीत. आयएफएस. दुसरा सिंगापूरमध्ये आयबीएम मध्ये फार वरच्या पदावर. सासरे पंचतारांकित हॉटेल चेनचे मालक. वडील निवृत्त आयपीएस. आजोबा माजी आमदार.

प्रांतांना पाहून धीरेन्द्र हसत हसत प्रचंड थकल्याचा अभिनय करत सोफ्यात कोसळला. प्रांतांना एसेमेस वर लेटेस्ट बातमी समजली होतीच. त्यांनी एस्पींचं अभिनंदन केलं. पहाटे पहाटे त्यांनी चार नक्षल मारले होते. तीन जण पकडले होते. विशेष म्हणजे हे तीनही जण आसामचे होते. धीरेन्द्र एन्काउंटर मॅन म्हणून एव्हाना ओळखला जाऊ लागला होता. इंटेलिजन्स मॅन, सरेण्डर मॅन या अन्य ‘कॅटेगरीज’ होत्या. प्रांतांच्या स्वरातलं कौतुक ऐकून धीरेन्द्र फ्रेश झाला.

सोफ्यात सावरुन बसत धीरेन्द्र म्हणाले, ‘अजित, हे सगळं ठीक आहे. पण अजून एक वाईट बातमी ऐकलीयस का? सुन्द्री कुंभारची?’

‘कोण सुन्द्री कुंभार? काय झालं तिचं?’

‘ओके. तुला सगळंच सांगायला पाहिजे. अगोदर मीडिया काय म्हणतेय ते वाच, मग सांगतो.’ एस्पींनी जागरण चा अंक पुढे केला. पहिल्याच पानावर ती बातमी होती. शरण आलेल्या नक्षल महिलेला नक्षल्यांनी तिच्या पाच वर्षांच्या मुलासह मारुन टाकले. सुन्द्री सहा वर्षांपूर्वी पोलीसांना शरण आली होती. तत्कालीन एस्पी, जे योगायोगाने सध्याचे डीआयजी आहेत, त्यांनी तिला पुनर्वसित करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आर्थिक विपन्नावस्थेमुळे तिची वाताहत झाली. तिचा पती उपचारांअभावी नुकताच मरण पावला होता. त्यातच पोलीस संरक्षणही नसल्यामुळे तिच्या मागावर असलेल्या नक्षल्यांनी तिचा सहज बळी घेतला. सुन्द्रीच्या मदतीसाठी मारलेल्या हाका बधीर प्रशासनाला ऐकूच गेल्या नाहीत.

बातमी वाचून प्रश्नार्थक मुद्रेने प्रांतांनी एस्पींकडे पाहिले.

एस्पी म्हणाले, सहा वर्षांपूर्वी सध्याचे डीआयजी इथे एस्पी होते. त्यांना एके रात्री बातमी मिळाली: ट्वेंटीटू प्लॅटूनची एक नक्षल मुलगी एका दवाखान्यात गर्भपात करुन घ्यायला आलीय. यांनी ताबडतोब माणसे पाठवून तिला ताब्यात घेतले. त्यावेळी सरकारची नक्षल्यांच्या शरणागतीविषयी, त्यांच्या पुनर्वसनासाठी काही पॉलिसी नव्हती. शहामृग अ‍ॅप्रोच होता. आपले डीआयजी मोठा विचारी माणूस. त्यांनी या मुलीला, सुन्द्रीला, विचारलं, शरण ये, तुझे गुन्हे माफ करतो. ती कबूल झाली. बरीच माहिती दिली. डीआयजी शब्दाला जागले. त्यांनी तिला इथेच सेटल करण्यासाठी; परत गावी पाठवू शकत नव्हते; तिचं लग्न एका रिलक्टंट तरुणाशी लावून दिलं. तो असाच दुसऱ्या एका केसमध्ये अडकला होता. त्यालाही माफीचं प्रलोभन दाखवून यांचा पाट लावून दिला. त्या बाबाला एका कारखान्यात नोकरीही लावून दिली. काही दिवस ठीक चाललं. पुन्हा हा माणूस दारुच्या आहारी गेला. मी इथे एस्पी झालो त्यावेळी ही बाई माझ्याकडे रडत आली. म्हणाली, मला त्यावेळी एस्पींनी पन्नास हजार द्यायचं कबूल केलं होतं. मला ते पैसे द्या. हे असं काही एस्पींनी कबूल केलेलं नव्हतं हे मला माहीत होतं. पण ती आमच्याच सांगण्यावरुन शरण आलेली होती. मग मी माझ्या अखत्यारीत तिला होमगार्डमध्ये भरती करुन घेतलं. महिना साडेचार हजाराची तिची सोय झाली.

पण नक्षल्यांना तिची आठवण सहा वर्षांनी कशी काय झाली? प्रांत कुतुहलाने म्हणाले.

सांगतो. आता हा आमचा अंदाज आहे. महंमद मलिक नावाचा एक डेडली नक्षल काल रात्री आम्ही मारला. त्याची माहिती ह्या बाईनं आम्हाला दिली अशा संशयावरुन त्यांनी तिला मारलं. संशय अशासाठी, की गेले दोन महिने या दोघांचं गुटुर्घू चाललं होतं. हिचा नवरा सहा महिन्यांपूर्वीच दारु पिऊन मेला होता. त्यानं त्याची नोकरीही केंव्हाच सोडलेली होती. महंमदच्या मोबाइलवरुन हिला शेवटचा एसेमेस असाच गेला होता – लव्ह यू. कल शामको मिलेंगे. दोघेही मेले बिचारे. त्या बाईचं मला खरंच वाईट वाटलं. तिचा नक्षल्यांशी हे महंमद प्रकरण सोडलं तर काहीच संबंध नव्हता.

प्रांत अलिप्तपणे सगळं ऐकत होते. त्यांच्या डोळ्यांपुढे फक्त गळा चिरलेलं ते पाच वर्षांचं अश्राप बालक दिसत होतं. त्यांना दु:ख फक्त त्याचंच वाटत होतं.

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

प्रांतांच्या गोष्टी -५ नोकरशाहीतील बंधुता!

ठाकूरगढहून प्रांत बदली होऊन इस्पातनगरला प्रमोशनवर एडीएम म्हणून रुजू झाल्यानंतरची गोष्ट आहे. इस्पातनगर शेजारच्या जिल्ह्यात. एकाच रेव्हेन्यू डिव्हिजनमध्ये. अर्थात विभागीय आयुक्त तेच राहिले होते, जिल्हाधिकारी बदलले होते.

इस्पातनगरमध्ये जागांचे भाव आकाशाला भिडले होते. प्राइम एरियात एकरी सहा ते सात कोटी रुपये भाव होता. पहिले एक दोन महिने तटस्थ निरीक्षण केल्यानंतर प्रांत पाण्यात उतरले. पुढच्या दीड महिन्यांत कठोरपणे अतिक्रमणे हटवायला सुरुवात केली.

पहिल्याच कारवाईत प्रांत (अर्थात एडीएम, पण गोष्ट प्रांतांची असल्यामुळे प्रांतच म्हणूया) स्वत: रस्त्यावर उभे राहिले. नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी म्हणत होते, सर फोन ऑफ करून सर्किट हाऊसवर थांबा. आम्ही आटोपतो तासाभरात. नाहीतर लोक दबाव आणतील. प्रांत म्हणाले, प्रिसाइजली त्यासाठीच मला इथे रहायचंय. लेट देम नो, कसलाही दबाव काम करत नाही!

कार्यकारी अधिकाऱ्यांची भीति खरी ठरली. स्थानिक नेतेमंडळी दुकानदारांचा जत्था घेऊन प्रांतांभोवती कोंडाळं करून उभी राहिली. पोलीस तातडीने त्यांना हटवू लागले. प्रांतांभोवती कॉर्डन केले. प्रांतांनी जत्थ्यातल्या पाच सहा जणांना कॉर्डनच्या आत घेतले. अल्प परिचित असे काही स्थानिक नेते होते. त्यांचे बोलणे केवळ लक्ष देऊन ऐकले. काहीही बोलले नाहीत. कारवाई चालूच होती. कार्यकारी अधिकारी एक डोळा या घडामोडींवर ठेऊन बुल्डोझरला सूचना देत होते. मंडळ बोलून ओरडून थकल्यावर प्रांत म्हणाले, मी आलोय इथे सहा महिन्यांसाठी. ही जागा सुंदर झाली तर तुमच्यासाठीच होणार आहे. पुन्हा आरडाओरडा सुरु झाला. शांत झाल्यावर पुन्हा प्रांत म्हणाले, आजार हाताबाहेर जायच्या आत पाय जसा कापावा लागतो, तसंच हे अतिक्रमण हटवणे आहे. अर्धा पाऊण तास हुज्जत घालूनही काही फरक पडत नाही म्हणल्यावर सर्वांनी वस्तुस्थिती स्वीकारली. प्रांतांचा फोन स्विच ऑनच होता. पण स्थानिक मंत्री/ आमदार कुणाचाच फोन आला नाही. कारवाई पार पडली. ठरल्याप्रमाणे.

या अनुभवानंतर शहराला कडक मेसेज गेला. हे अतिक्रमण हटाव दुकानांचे होते. परंतु पुढच्याच आठवड्यात प्रांतांनी प्रतिष्ठित अशा सिव्हिल टाउनशिपमध्ये, रेसिडेन्शियल एरियात बुल्डोझर नेला. लोकांनी प्लॉटच्या सीमेला खेटून घरे बांधली होती, आणि ड्रेनेज व रस्त्यांवर साताठ फूट पुढे कुंपण घालून गॅरेज, आउटहाउस आणि बागा केल्या होत्या. रस्त्याच्या नावाला चिंचोळ्या गल्ल्या ठेवल्या होत्या. या वस्तीत सगळे पांढरपेशे होते. रस्त्यात विरोध कुणीच केला नाही; थोडीफार फोनाफोनी करण्याचा निष्फळ प्रयत्न मात्र झाला. सगळ्या बागा, गॅरेजिस अडीच तीन तासांत जमीनदोस्त झाल्या. यानंतर मात्र शहरात एकाच वेळी भीति आणि आशेचे वातावरण पसरले.

यानंतर दीडच महिन्यांत सहा मोठे ड्राइव्ह काढून शहरभरात मोठमोठाली अतिक्रमणे हटवली गेली.

पण गोष्ट ही नाही. गोष्ट वेगळीच आहे.

*********

विभागीय आयुक्त जिल्ह्याच्या ठिकाणी येणार होते. त्यांनी कलेक्टरांना सांगीतले, एडीमना बोलावून घ्या. अतिक्रमणांचा रिव्ह्यू घ्यायचाय. कलेक्टरांनी एडीएमना तसे सांगताच एडीएम, अर्थात आपले प्रांत, डिटेल्ड नोट तयार करून वेळेआधी अर्धा तास कलेक्टरांच्या चेंबरमध्ये हजर झाले.

इस्पातनगरचा कारभार बराचसा स्वतंत्र चालायचा. बारकाव्यांमध्ये कलेक्टर लक्ष घालत नसत. त्यांना या पाडापाडीची कल्पना होती. पण नोटमध्ये दिसत असलेला प्रांतांचा स्कोर इम्प्रेसिव्ह होता.

नोट डोळ्यांखालून घातल्यावर कलेक्टर प्रांतांना म्हणाल्या, ‘अजित, तुझ्या मागच्या पोस्टिंगमध्ये या कमिशनरांसोबत तुझा काही इश्यू झालाय का?’ कलेक्टर थोड्या कोड्यात पडल्या होत्या. प्रांतांच्या डोक्यात हे कोडे तातडीने सुटले, पण त्यांनीही कोडे पडल्यासारखा चेहरा करून ‘का मॅडम’ असं विचारलं.कलेक्टर म्हणाल्या, ‘अरे एवढं मस्त काम चाललंय, पेपरात पण येतंय, आणि तरीही हे कमिशनर मला सारखे विचारत असतात, नवा एडीएम काही करतोय का, त्याला बसू देऊ नको, अतिक्रमणं निघाली पाहिजेत.’

प्रांत क्षणभर थांबले. म्हणाले. मॅडम. मी यावर काही बोललो तर ते खरं तर ठीक होणार नाही. शॅल आय टॉक सम शॉप? दॅट मे हेल्प सॉल्व्ह युवर पझल.

कलेक्टरांनी प्रांतांकडे नुसतेच पाहिले. डोळ्यांत. प्रांत थोडे थांबले. मग म्हणाले,‘माझ्या मागच्या पोस्टिंगमध्ये पन्नास वर्षांत कधी बुल्डोझर चालला नव्हता तो पहिल्यांदा चालला. सबडिव्हिजन जेलच्या भिंतीला खेटून पंचवीस पक्की दुकाने होती. कसल्याही गडबड-गोंधळाशिवाय शिस्तीत पाडली. कुणीही मोबदला वगैरे मागायला आलं नाही. माझ्या सबडिव्हिजनमध्ये दोन नगरपालिका होत्या. तिथेही जागांचे भाव खाणींमुळे वाढलेले होते. तिथे दोन ऑपरेशन्स केली. हजार लोक मोर्चा घेऊन आले होते. मी त्यांना सांगीतलं होतं, मी पोलीस परत पाठवतो, आणि एकटाच पाडतो. ज्याला अडवायचं असेल ते समोर या. तेही शिस्तीत पार पडलं. पुढचं टारगेट काही मोठ्या इमारती होत्या. मीनव्हाइल राजकारण सुरू झालेलं होतं. कुणाच्या सांगण्यावरून ही पाडापाडी होतीय यावरून स्थानिक आमदार आणि नगराध्यक्षांमध्ये जुंपली होती. नगरपालिका मला मुळीच सहकार्य करत नव्हती. नगराध्यक्ष कलेक्टरांकडे धरणे धरून बसले होते, प्रांतांना आवरा म्हणून. माझ्या तहसीलदाराला मंत्रालयातून फोन येत होते, आमच्या माणसांना का त्रास देताय म्हणून. मला कुणीही बंद करा म्हणत नव्हतं. आमदार अडचणीत आले होते, पण तेही मला फोन करून छान चाललंय असंच म्हणत होते. या परिस्थितीत मला तिथल्या कलेक्टरांकडून बंद करायची हिंट मिळाली.’

कलेक्टरांनी अविश्वासाने प्रांतांकडे पाहिले. ‘तुला एका डायरेक्ट ऑफिसरने बंद करायला सांगितलं?’

‘येस्स. हिंट दिली. त्या असं म्हणाल्या, जपून कर. लॉ अ‍ॅण्ड ऑर्डरचा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपल्याला परवडणार नाही. जे करायचं ते एस्पीला विचारुन कर.’

‘मग एस्पी काय म्हणाले?’

‘एस्पी वॉज माय गुड फ्रेण्ड. ते म्हणाले गो अहेड. तुला हवा तेवढा फोर्स देतो.’

‘मग?’

‘मग काय, मला निरनिराळ्या असाइनमेंट देण्यात आल्या. आठवड्यात एकही दिवस मोकळा मिळत नव्हता. तहसीलदारही मला समजाऊन सांगू लागला की सर हा माणूस मंत्र्याना हेवी फायनान्सिंग करतो, आपल्याला या अमक्या अमक्या प्रकरणात अडचण होऊ शकते इत्यादि डायनॅमिक्स सांगू लागला. हायकोर्टात कशी गडबड चालते याचे दाखले देऊ लागला. सो आय गॉट द मेसेज. दरम्यान माझ्या बदलीची ऑर्डर आलेली होतीच.’

‘ठीक आहे. पण याचा आणि कमिशनरना तुझ्याविषयी असं वाटण्याचा संबंध काय?’

‘मॅडम, फार जवळचा संबंध आहे. कमिशनर मला कलेक्टरांच्या मार्फत ओळखत. मी रिलिव्ह झालो त्यादिवशी एस्पीकडे जेवायला गेलो होतो. एस्पी मला अनेक गोष्टी बोलले होते. त्यातली एक ही होती – त्यांना कलेक्टर एकदा म्हणाल्या होत्या, हा प्रांत काय नस्त्या उचापती करत बसलाय? उगीचंच पाडापाडी करायला लागलाय.’

‘धिस इज अनबिलिव्हेबल. कलेक्टरसाठी डायरेक्ट ऑफिसर हा फार मोठा रिलिफ असतो! शिवाय सर्विस फ्रॅटर्निटी असतेच की.’

‘इतक्या महत्त्वाच्या गोष्टीत जर कलेक्टरची ही अ‍ॅसेसमेंट असेल, तर माझ्या बाकीच्या कामांचं काय मूल्यमापन झालं असेल? तर मॅडम, कमिशनरना माझी ओळख एक अकार्यक्षम अधिकारी अशी झाली असेल, तर मला फार आश्चर्य वाटणार नाही. आणि तशी ओळख कमिशनरही मनात ठेऊन असतील, तर धिस पर्टिक्युलर रिव्ह्यू आल्सो हार्डली मॅटर्स!’

प्रांतांचा टोन थोडा कडवट झाला होता. कलेक्टर काहीच बोलल्या नाहीत. हसत हसत एवढंच म्हणाल्या, अजून चार महिन्यांनी तुला माझ्याच खुर्चीत बसायचंय तेंव्हा दुसऱ्या अधिकाऱ्याशी कसं वागायचं नाही याचा हा चांगला अनुभव मिळालाय तुला!’