शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

जय हिन्द - 2


दिवसभर हेच कलेक्टरांच्या मनात घोळत राहिले. रात्री जेवणानंतर शतपावली करत असताना त्यांनी डीआयजींना फोन लावला. डीआयजी, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल, यांच्या अखत्यारीत हा जिल्हा धरून एकूण सहा जिल्हे येत होते, आणि त्यांचे मुख्यालय हाच जिल्हा होते. बीएसएफ चा कारभार स्वतंत्र असला तरीही हे अर्धसैनिकी दल राज्य सरकार, आणि पर्यायाने जिल्हा प्रशासन आणि पोलीसांना जबाबदार होते. कलेक्टरांनी आपली काळजी डीआयजींना बोलून दाखवली. डीआयजींना समस्या समजली.

ते म्हणाले, 'बीएसएफ साधारणतः पाकिस्तान सीमेवर तैनात असल्यामुळे त्यांना तिरंग्याविषयी विशेष प्रेम असते, आणि इथल्या गावांमधून असलेल्या भारतीय नक्षल शत्रू आणि पाकिस्तानी शत्रूंमधील फरक त्यांच्या लक्षात येणे कठीणच दिसते. पण तुमची काय अपेक्षा आहे?' 

कलेक्टर म्हणाले, 'बीएसएफ ला शाळांमधील, तसेच ब्लॉक ऑफिसमधील झेंडावंदनाकडे दुर्लक्ष करायला सांगा.'

'बरे आहे,' डीआयजी म्हणाले.

कलेक्टरांनी फोन ठेऊन बीएसएफ च्या डीआयजींना फोन लावला. निर्भयसिंह. उमदा बिहारी राजपूत. दोनच महिने झाले होते त्यांना जॉईन होऊन. कलेक्टरांनी त्यांच्याशी अद्याप विशेष चर्चा केलेली नव्हती, त्यांना त्यांचा वेळ देत होते. फोनवर त्यांच्याशी बोलताना कलेक्टरांनी प्रस्तावनेने सुरुवात केली. त्यांना 'झेंडावंदन करु नका' असं सांगतोय असं वाटायला नको! पण कलेक्टरांना सुखद धक्का बसला. निर्भयसिंह म्हणाले, 'आमच्या जवानांना झेंडा पाहिला की विशेष जोम येतो. त्यांना मी शाळांकडे पाठवतच नाही. काही काळजी करु नका!'

कलेक्टरांची एक काळजी तात्पुरती का होईना, मिटली. पण त्यांचे काळीज कुरतडले जात होते. अगदी सुरुवातीपासून त्यांना जिल्हा मुख्यालयातील झेंडावंदनापेक्षा खेड्यापाड्यांतील शाळांमधील झेंडावंदन महत्वाचे वाटत आले होते. नक्षलग्रस्त खेड्यांमधील शाळेत जाणार्‍या मुलांना आपण काय संदेश देणार आहोत? आपल्याच देशात आपण आपला झेंडा फडकाऊ नाही शकत? तिढाच होता. इलाजही नव्हता. दिसला शत्रू-घाल गोळी इतके सरळ समीकरण नव्हते इथे.

*****

पंधरा ऑगस्ट पार पडला. सोळा ऑगस्टला कलेक्टरांनी निर्णय घेतला. एडगुमवाल्साला जायचे. कुणालाही न सांगता.

पंधरा ऑगस्टच्या आसपासचा एक आठवडा नक्षलग्रस्त भागात जाणे शहाणपणाचे नसे. कुठे भूसुरुंग लावलेले असतील आणि कुठे अ‍ॅम्बुश लावलेले असेल सांगता येत नसे. पोलीस आणि जवानांना तर जिवाचाच धोका होता; पण कलेक्टरांना तेवढाच मोठा धोका अपहरणाचा होता. अपहरण तर फारच सोपे. पन्नास शंभर लोक मोबिलाइज करणे नक्षलांना मुळीच अवघड नव्हते. आणायचे गाडीसमोर. त्यातही बायका असल्या म्हणजे काम फत्तेच. मग कितीही सुरक्षेचा ताफा सोबत असूनही काही उपयोग नाही. असेही कलेक्टर आपल्यासोबत केवळ एक सुरक्षा रक्षक घेऊन फिरत. साध्या वेशातील. त्याच्याजवळ एक कन्सील्ड पिस्तूल असे. त्याचे कमांडो ट्रेनिंग झालेले होते, आणि पूर्वी त्याने नक्षलविरोधी कारवायांमध्ये भाग घेतलेला होता. असे दोन रक्षक आळीपाळीने ड्यूटी करत. वास्तवात त्यांचेच संरक्षण ही कलेक्टरांना स्वतःची जबाबदारी वाटे. परिस्थिती अशीच होती. चार बंदूकधारी नक्षलांनी हल्ला केला किंवा पन्नास निशस्त्र लोकांचा जमाव चालून आला तरी दोन्ही परिस्थितींमध्ये अशा रक्षकाचा काहीही उपयोग नव्हता. शेजारील केसिंगा जिल्ह्याच्या कलेक्टरांना एका गावातील भर सभेतून नक्षलवाद्यांनी अपहृत करताना त्यांच्यासोबत असलेल्या दोन रक्षकांना अगोदर गोळ्या घालून मारले आणि मग कलेक्टरांना पकडले होते. आणि हे होत असताना केसिंगा कलेक्टर ओरडून सांगत होते, मी कलेक्टर आहे, कुणाला मारू नका. तरीही. केसिंगा कलेक्टर या कलेक्टरांचे मित्रच होते आणि ते किती संवेदनशील मनाचे होते हे यांना माहीत होते. कलेक्टरांनी आपल्या दोन्ही रक्षकांना कुठेही पोलीसाप्रमाणे न वागण्याविषयी बजावून ठेवले होते. केवळ सुरक्षा प्रोटोकॉल आणि दुर्गम भागातील टूरमध्ये सोबत या उद्देशांसाठी कलेक्टर हे रक्षक सोबत ठेवत असत.  

कलेक्टरांनी क्रांत राठोडला फोन लावला. क्रांत बीएसएफ मध्ये डेप्युटी कमांडंट होता. एडगुमवाल्सा त्याला तळहाताप्रमाणे पाठ होता. सगळी गावे त्याने गेल्या दोन वर्षांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन्समध्ये पालथी घातली होती. सगळे अवघड डोंगर चढून उतरुन त्याने आदिवासी वाड्या वस्त्या जवळून पाहिल्या होत्या. कलेक्टरांना क्रांत विशेष आवडे कारण क्रांत विचारी होता. लढाईचा पेशा त्याचा होता खरा; पण बंदुकीवर त्याचा विश्वास नव्हता. बंदूक हातात असली की माणूस भित्रा बनतो असे त्याचे मत होते. सर्व आदिवासींकडे संशयाने बघत कॉर्डन अ‍ॅण्ड सर्च ऑपरेशन्स करणार्‍या बंदूकधारी सैनिकांमध्ये क्रांतसारखा अधिकारी अपवाद होता. नक्षलवादाची त्याची समज बंदुकीच्या लढाईच्या पलीकडे पोचली होती. इथले लोक गरीब असण्याचे कारण काय आहे; गरीब असूनही एवढे आनंदी असण्याचे कारण काय आहे; आनंदी असूनही इथेच एवढा 'असंतोष' असण्याचे कारण काय आहे अशा प्रश्नांचा मागोवा घेत त्याने कलेक्टरांसोबत बसून चर्चा करुन विकास यंत्रणा, पंचायत राज व्यवस्था समजाऊन घेतली होती. सरकारविरुद्ध शस्त्रे हातात घेतलेल्या आदिवासींची वर्णने करणार्‍या रोमँटिक विचारवंतांना क्रांत सहज निरुत्तर करु शकला असता इतका त्याने इथला आदिवासी जवळून पाहिला होता. नक्षल प्रोपॅगण्डा समजू शकणार्‍या फार कमी फौजींपैकी क्रांत होता. कलेक्टरांनी क्रांतला 'येतोस का' असे विचारले. क्रांतने आपल्या कमांडंटची परवानगी घेतली आणि कलेक्टरांच्या घरी हजर झाला.

कलेक्टरांनी नेहेमीच्या गाडीहून निराळी गाडी मागवली. क्रांतला सोबत घेऊन त्यांनी घर सोडले. 

सोमवार, १० जून, २०१३

मन्या सुर्वे


साधारणपणे पंधरा सोळा वर्षांपूर्वी अविनाश धर्माधिकारींच्या तोंडून हे नाव पहिल्यांदा ऐकले होते. जुलिओ रिबेरो यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबई (बॉम्बे) पोलीसांनी केलेले पहिले "एन्काउन्टर". मन्या सुर्वेचे. उत्सुकता होती. पण अधिक माहिती मिळाली नव्हती. रमा नाईक, अरुण गवळी, सदा पावले अशी आपल्या भागातील वाटावीत, गावाकडली माणसे वाटावीत अशी नावे असणारी माणसे मुंबई अंडरवल्डमध्ये काय करतायत असा एक भाबडा प्रश्न मनात येऊन जाण्याचे नाव काढीत नसे. हाजी मस्तान, वरदराजन मुदलियार, दाऊद इब्राहिम इत्यादि नावे जरा तरी 'एलियन' होती. तरी 'कासकर' त्या एलियनगिरीला छेद देत होतेच. हिंदी सिनेमांमध्ये गुन्हेगारीचे जे काही चित्रण केले गेलेले आहे ते त्या पटकथाकार आणि दिग्दर्शकांच्या अकलेची कीव करण्यापलीकडे काहीही साध्य करत नाही. त्यामुळे असल्या चित्रणातून या अंडरवल्डविषयी काहीही ज्ञान मिळणे केवळ दुरापास्त. त्यातल्या त्यात थोडी समज वाढवणारा एक चित्रपट फार पूर्वी येऊन गेला - सिंहासन. त्यात तत्कालीन सामाजिक परिस्थिती दाखवण्याच्या मिषाने स्मगलिंगविषयक एक उपकथानक येऊन जाते. स्मगलिंग हा अंडरवल्डचा एक आस्पेक्ट झाला. 'अर्धी मुंबई' हे युनिक फीचर्स ने प्रसिद्ध केलेले पुस्तक या विषयाची समज थोडी खोल करते. अर्थात हे गुन्हेगारीविषयक पुस्तक नव्हे. पण मुंबई समजत गेली की अंडरवल्ड आपोआप उलगडत जाते. अलीकडेच वाचनात आलेल्या "डोंगरी टू दुबई" या पुस्तकाने माझी बरीचशी उत्सुकता शमवली, आणि अजून बरेच कुतुहल चाळवले. ब्लॅक इकॉनॉमी कशी आपल्या रोजच्या जगण्याला भिडलेली आहे, आपण ब्लॅक इकॉनॉमीचे कळत नकळत कसे भाग आहोत, आणि ब्लॅक इकॉनॉमीचे इंजिन चालवणारे अंडरवल्डमधील मोहरे प्रत्यक्षात आपल्या जगण्याचे कसे सूत्रधार आहेत याच्या बर्‍याच हिंट्स या पुस्तकातून समोर येतात.

हाजी मस्तान, दाऊद, वरदराजन यांच्या आख्यायिकांवर/ दंतकथांवर आधारीत अगणित सिनेमे येऊन गेले. अमिताभचे करियर या आख्यायिकांनी घडवले म्हणा ना. दीवारमधील हमाली करणारा अमिताभ, ब्रॅण्डेड गॉगल्स घालून गगनचुंबी इमारतीकडे ऐटीत पहात 'ही इमारत मी माझ्या आईला भेट देणार आहे, कारण इथे माझ्या आईने डोक्यावर विटा वाहल्या आहेत' असे म्हणणारा अमिताभ, अमर अकबर अँथनी मधील स्मगलर्स, आदि असंख्य भूमीकांमधून दिग्दर्शक त्यांच्या कल्पनांमधील अंडरवल्डचा रोमान्स आपल्याला दाखवत राहिले. त्यांच्या कल्पनेतील मस्तान, दाऊद, वरदा आपल्याला दाखवत राहिले. अगणित सुमार दर्जाच्या चित्रपटांनी याच्या नकला पाडण्यात धन्यता मानली. तरी दयावान/ नायकन सारखे अपवाद वगळता कुणी खर्‍या 'डॉन' मंडळींचे चरित्रपट काढण्याचा प्रकार केला नव्हता. राम गोपाल वर्माच्या 'सत्या'मध्ये देखील कुठे खर्‍या गुन्हेगार मंडळींचा संदर्भ घेतलेला नव्हता. पहिल्यांदा अंडरवल्डचे पद्धतशीर चित्रण करण्याचा प्रयत्न राम गोपाल वर्माने 'कंपनी' मध्ये केला. फार चांगला प्रयत्न. त्या सिनेमातील मोहनलालने ज्यांची भूमीका साकारली होती त्या डी शिवानंदन या वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांना भेटण्याचा एकदा योग आला होता. त्यावेळी त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले होते, की 'कंपनी' सिनेमा हा वास्तवाच्या खूपच जवळ जाणारा आहे. कंपनी हा सिनेमा अनेक कारणांसाठी इतर सर्व गुन्हेगारपटांहून सरस होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे "धंदा" हा अंडरवल्डमधील अत्यंत महत्वाचा आणि (सर्वात महत्वाचा) घटक या सिनेमात व्यवस्थित अधोरेखीत केलेला होता; रस्त्यावरची मारामारी ही "कॉन्सिक्वेन्शियल" आहे, मूळ महत्वाचा आहे "धंदा" - ही बाब इतर गुन्हेगारपटांमध्ये दिसत नाही. अंडरवल्डच्या चित्रणामध्ये 'कंपनी'वरही मात करणारा सिनेमा म्हणजे 'ब्लॅक फ्रायडे' होय. ब्लॅक फ्रायडेची दोन बलस्थाने म्हणजे लेखक हुसेन झैदी, आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप. अशी संधी खरेतर अजून दोन चित्रपटांना मिळाली होती, पण दिग्दर्शकामध्ये पुरेसा वकूब नसल्याने दोन्ही सिनेमे सुमार दर्जाचे बनून वाया गेले - शूट आउट अ‍ॅट लोखंडवाला, आणि शूट आउट अ‍ॅट वडाळा.    

शूट आउट अ‍ॅट वडाळा हा एक सुमार दर्जाचा चित्रपट एका अतिशय उत्तम दर्जाच्या "डोंगरी टू दुबई" या झैदीने लिहिलेल्या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारीत आहे. अनुराग कश्यपने याचे सोने केले असते असे पुस्तक वाचून आणि सिनेमा पाहून वाटते. मला इथे सिनेमाची समीक्षा करायची नाहीये, त्या लायकीचा सिनेमा नाहीच आहे मुळात. मन्या सुर्वे नावाच्या हाँटिंग कॅरॅक्टर वर मनात असंख्य विचार येऊ लागले म्हणून हे लिहावेसे वाटले. १९६९ साली मन्याला अटक झाली. तुरुंगवास झाला. ७२ साली तुरुंगातून तो पळून गेला. दहा वर्षे पोलीसांच्या हातावर तुरी देत मुंबईत आपली दहशत माजवत बँका लुटत, खंडण्या गोळा करत माजात फिरत राहिला आणि शेवटी १९८२ मध्ये पोलीसांच्या गोळ्यांनी संपला. दाऊद त्याच्या आधीही होता. त्याच्यासोबतही होता. त्याच्यानंतरही आहे. अजून किती काळ राहणार आहे कोण जाणे. दाऊद हा कंटेम्पररी इतिहासातील एक महत्वाचा घटक आहे. गुन्हेगारी, अंडरवल्ड, टेररिझम या सगळ्या कक्षा ओलांडून दाऊद पल्याड पोचला आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा तो आधार बनल्याचे दावे केले जात आहेत. अजूनही दाऊदचे भूत महत्वाच्या घोटाळ्यांभोवती फिरत असते. डोंगरी टू दुबई या पुस्तकामध्ये झैदीने या संदर्भातील अर्थकारण, राजकारण, गुन्हेगारी फार सुंदर रीतीने उलगडून दाखवली आहे. मन्या सुर्वे हा या पार्श्वभूमीवर अगदीच किरकोळ आणि नगण्य असा भिडू वाटतो. पण कॅरॅक्टर इंटरेस्टिंग. या माणसाने नेहेमी असा दावा केला, की मला गुन्हेगार व्हायचे नव्हते; मला सिस्टमने गुन्हेगार बनवले. मला माहीत नाही असा दावा किती गुंड करतात. पण या एका दाव्याभोवती कितीतरी सिनेमे बनलेले आहेत. मला चटकन आठवणारा (आणि आवडता) सिनेमा म्हणजे 'गर्दिश'. अनेक आहेत. असंख्य आहेत. बरेचसे असह्य आहेत. पण सगळ्यांचा सोर्स हा एकच - मन्या सुर्वे. त्याचे नाव घेऊन सिनेमा हा आत्ता पहिल्यांदाच निघाला. (बँडिट क्वीन फूलन देवी, पान सिंग तोमर हेही असाच दावा करायचे. पण ते मुंबईबाहेरचे.) पण मन्याचे पुढले "करियर" पाहिले तर त्याचा हा 'मजबूरी' वाला दावा पोकळ वाटतो. 

मन्या म्हणजे मनोहर अर्जुन सुर्वे. हा बीए पास होता. डिस्टिंक्शन मध्ये. हॅडली चेस च्या कादंबर्‍या वाचायचा याला नाद. स्वत: गुन्हे करतानाही तो चेसच्या कादंबर्‍यांमध्ये दाखवल्याप्रमाणे प्लॅनिंग करायचा. त्याचे शरीर कमावलेले होते. तो सतत हत्यारे - पिस्तूल, सुरा - बाळगून तर असायचाच, पण हँड बॉम आणि अ‍ॅसिडही सोबत बाळगायचा. दहा वर्षे फरारच असल्यामुळे तो ही सावधगिरी कायम बाळगायचा. त्याचे पोलीसांशी साटेलोटे कधीच नव्हते. ६९ साली अटक, आणि ८२ साली एन्काउंटर एवढाच त्याचा पोलीसांशी प्रत्यक्ष सामना. हा अतिशय गरम डोक्याचा होता. कुणी "नाही" म्हटले की झाला याचा शत्रू. अगदी किचनपर्यंत घरोबा असलेल्या कॉलेजपासूनच्या मित्रालाही याने पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या होत्या. असल्या वृत्तीचा मन्या हा "मजबुरीने" गुन्हेगार झाला हा दावा पटत नाही. एकंदर मन्या सुर्वे हे एखाद्या सिनेमासाठी अत्यंत आकर्षक असे पात्र ठरते. एक सिनेमा अर्थातच वाया गेलेला आहे. 

मन्याचे एन्काउंटर अटळ होते असे एकंदर त्याच्या बाबतीतला घटनाक्रम पाहून वाटते. रिबेरोंसारखे उज्वल प्रतिमा असणारे पोलीस कमिशनर असताना त्याचा पोलीसांनी खातमा केला - कायदा हातात घेणारे काम केले. हे थोडे कोडे वाटते. दाऊदचे असल्या बाबतीतले तरबेज डोके पाहता त्याने पोलीसांना सुपारी दिली असे म्हणावे तर रिबेरोंची प्रतिमा आड येते. आणि हे एन्काउंटर अटळ होते, नाइलाजाने पोलीसांना करावे लागले असे म्हणावे तर मन्यानंतर केल्या गेलेल्या साडेआठशे एन्काऊंटर्स आणि त्यात मेलेल्या तेराशे लोकांचे काय जस्टिफेकेशन राहते?  ही सर्व एन्काउंटर्स नाइलाजाने केली गेलीत? न्यायव्यवस्था इर्रिलेव्हंट झाल्याचे आपण चक्क मान्य करत आहोत? की या बहाण्याने पोलीसही अंडरवल्ड या 'सिस्टेमिक बग' चाच भाग बनल्याचे आपल्याला पहावे लागत आहे? 

मन्या सुर्वेच्या निमित्ताने हे विचार मनात आले.