शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१२

वासेपूर



आत्ता पहायला मिळाला. 

गँग्ज ऑफ वासेपूर पाहताना त्यातील अनेक गोष्टी आपण प्रथमच पहात नसलो तरीही अंगावर येतात. शिवराळ बोली भाषा आणि मॅटर ऑफ फॅक्ट व्हायलन्स अनेक सिनेमांमधून पहायला मिळतो. वासेपूरचे ते काही यूएसपी नाही. प्रकाश झाच्या अपहरण, गंगाजल मधून व्यवस्था, गुन्हेगारी, राजकारण यांचे पद्धतशीर आकलन करवून देणारे दर्शन घडते. वासेपूर त्या बाबतीतही काही अगदी वेगळा, उठून दिसणारा किंवा पहिलाच सिनेमा नाही. कथानक म्हणाल तर खानदानी दुश्मनी, रोमिओ जुलिएट स्टाइलचे दुश्मन खानदानांतील प्रेमप्रकरण, माफिया धंदापद्धती या गोष्टीही नव्या नाहीत. अनेकानेक हिंदी सिनेमांच्या कथानकांमध्ये वासेपूरमधील प्रत्येक गोष्ट येऊन गेलेली आहे. त्यातही नवीन काहीच नाही. गॉडफादरच्या कथानकाची भ्रष्ट नक्कल असलेला सरकार असो, की सत्या-कंपनीसारखे, सेहर सारखे वास्तवाच्या जवळ जाऊन थेट शैलीत माफिया अंडरवल्ड दाखवणारे सिनेमे असोत - कथेत किंवा सादरीकरणातही "प्रथमच आपल्या शहरात" असलाही प्रकार नाही. असे असतानाही हा सिनेमा मला "हाँटिंग" वाटला. स्टाइल नवीन नाही; कथानक नवीन नाही. मग नवीन आहे तरी काय? 

विशेष आहे आकलन, आणि ते आकलन सादर करण्याची शैली यांचा सुरेख संगम. कथानक घोटाळते मायक्रोलेव्हलवर. धनबाद - वासेपूर भागातील स्थानिक माफियागिरी - राजकारण. पण पट प्रचंड व्यापक आहे. पूर्व भारतातील म्हणा, किंवा एकंदरच भारतातील म्हणा, गव्हर्नन्स (फॉर दॅट मॅटर अ‍ॅबसेन्स ऑफ गव्हर्नन्स) वर हा सिनेमा म्हणजे एक जबरदस्त टिप्पणी आहे. ज्या कुणी आपली कायदा आणि न्यायव्यवस्था आणि त्यासंदर्भात राजकारण थोडे जवळून पाहिले आहे त्याला या सिनेमा निर्मात्यांच्या आकलनाचे कौतुक वाटल्याखेरीज राहणार नाही. 

इतिहासाचे पद्धतशीर संदर्भ देत स्वातंत्र्यपूर्व काळापासून सद्य काळापर्यंतचा पट हे कथानक व्यवस्थित गोंधळ न घालता उलगडत नेते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून राजकारण, पोलीस, माफिया, सामाजिक उतरंड - सगळे  खाडकन असे समोर येते. अन्स्टेटेड नॅरेशन - न सांगता बरेच काही सांगायचे, आणि तेही निष्कर्ष न काढता - हे या सिनेमाला उत्तम साधलेले आहे. 

शाहिद पठाण डकैती सोडून बायकोला वचन दिल्याप्रमाणे इमानदारीत कोळशाच्या खाणीमध्ये मजूरी करु लागतो. आपल्यावरचा अन्याय सहन न होऊन तिथल्या खाणमालकाच्या पैलवानाचा तो मालकासमक्ष खून करतो. बेरकी मालक त्यालाच आपला पैलवान बनवतो, आणि आपली खाण चालवू लागतो. मजूरांना दम देणार्‍या शाहीदला एक मजूर म्हणतो, भाई तू तर आमचाच...तर त्याला शाहीद खाड्कन मुस्काटात ठेऊन देतो. शाहीदचा भाऊ फरहान त्याला म्हणतो, हे गरीब मजूर तर आपलेच सगे. त्यांच्या जमिनी हिसकाऊन घ्यायच्या, त्यांना वेठीला धरायचे हे तुला योग्य वाटते का? शाहीद उत्तरतो, यहाँ कोई किसीका सगा नही होता. बास. एका क्षणात राष्ट्रीय नेत्यांच्या भाबड्या समाजवादाच्या चिंध्या. चिंध्या अशासाठी की पंडीतजींचे "ट्रिस्ट विथ डेस्टिनी"चे शब्द अजून विरलेलेही नाहीत. हे असले खाणमालक, आणि त्यांचे पैलवान म्हणजे ग्रासरुटमधून येणारे लोकशाहीतील नेतृत्व. आपल्या देशातील राजकारणाची "हळूहळू" अधोगती होत गेली असे समजायचे काही कारण नाही. कधी कधी वाटते, आपल्या घटनाकारांनी ज्या न्याय समता बंधुता इत्यादि उदात्त विचारांवर आधारीत व्यवस्थेची मांडणी केली, ती नको तेवढी भाबडी तर नाही? लोकशाहीच्या आदर्श स्वप्नापुढे आपण कायदा सुव्यवस्था, न्यायव्यवस्था यांचा बळी तर दिलेला नाही? ज्या समाजामध्ये बळी तो कान पिळी हे तत्व सत्य म्हणून स्वीकारले गेले आहे, नाईलाज म्हणून नव्हे; तर वास्तव म्हणून, मूलभूत धारणा म्हणून, त्या समाजावर फ्रेंच राज्यक्रांतीतून निघालेले आणि मॅग्नाकार्टापासून विकसित होत असलेले युरोपियन सिद्धांत आपण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी सरळ सरळ थोपून दिले. एखाद्या जुन्या भिंतीला वरवर गिलावा द्यावा तसे. त्याचे पद्धतशीर पोपडे पडताना आपल्याला वासेपूरमध्ये दिसतात. इंग्रज निघून गेले, आणि खाणवाटपाची बंदरबाँट चालू झाली. इंग्रज मजूर ठेवायचे, पण छत द्यायचे, हमारी वो औकात नही थी...असे आपल्याला निवेदक फरहान सांगतो. त्या पार्श्वभूमीवर शाहीद पठाण मजूरांच्या झोपड्या जाळताना आणि त्यांना खाणीसाठी हुसकावून लावताना दिसतो. याला सामाजिक परिस्थिती म्हणायचे की राजकीय परिस्थिती, की गवर्नन्सचे अपयश म्हणायचे हे बघणार्‍याने ठरवावे. 

माफियागिरी अर्थात संघटित गुन्हेगारी म्हणजे केवळ पोटे भरण्याचे साधन नसून सत्ताकारणाचा एक अविभाज्य अंग आहे. आता सत्ताकारणाच्या सोयीसाठी गुन्हेगारी; की गुन्हेगारी धंद्यांच्या सोयीसाठी सत्ताकारण हे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार ठरेल. वासेपूरमध्ये आपल्याला दुसरा प्रकार पहायला मिळतो. विधायक रामधारी सिंग हा मुळात ठेकेदार, खाणमालक, आणि आपल्या व्यावसायिक हितांना जपण्यासाठी सत्ताकारण करणारा. धान्याने भरलेल्या ट्रेन लुटणारे कुरेशी, पठाण हे मुळात वाटमारी करुन पोटे भरणारे. पण गव्हर्नन्सच्या अभावी सत्तेची आणि नेतृत्वाची पोकळी भरुन काढून आपापल्या भागातील सत्तेची सूत्रे हातात ठेवणारे. मोहर्र्मच्या छाती पिटण्याच्या उन्मादक विधीत कुरेशी मंडळी मग्न असताना वासेपूरमध्ये अगदी निवांतपणे सरदार पठाण मोटरसायकलवरुन आपल्या भावासोबत फिरत कुरेशांच्या घरां-दुकानांवर गावठी बाँम टाकत फिरतो. कसायांचे सुरे घेऊन अगदी थंड डोक्याने एकेकाला धरुन खाली पाडून मारुन अक्षरशः खांडोळी करतात. बारीक बारीक तुकडे करुन शव नाहीसे करतात. या प्रकाराला केवळ गुन्हेगारी म्हणताच येत नाही. हे तर सत्ताकारण. स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष. आणि येथे कायद्याच्या राज्याला स्थान नाही. या सर्वांची ऐतिहासिक मुळे शाहीद पठाणाच्या इंग्रजी काळात ट्रेन लुटण्याच्या "पेशा"पासून आपल्याला हा सिनेमा दाखवतो. कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण करुन प्रशासक नेमला जातो. त्या कोल इंडियाच्या अधिकार्‍याचा सिंग मंडळींना ताप होऊ लागतो, तर त्याला सरळ कापून काढतात. ही केवळ गुन्हेगारी नव्हे. निव्वळ माफियागिरीही नव्हे. कारण ही कापाकापी करणारा रामधारी सिंग आमदार होतोय. मंत्री होतोय. एस्पीला हाताशी धरुन डोके वर काढणार्‍या सरदार पठाणाला चेपू पाहतोय. स्वतःच्या धंद्यासाठी सत्ता राबवतोय. 

एका अर्थाने ही सध्याच्या राजकारणावरील टिप्पणी आहे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा (़किंवा गुन्हेगारीच्या राजकियीकरणाचा) हा प्रकार केवळ बिहारपुरता मर्यादित होता, आणि नंतर सगळीकडे पसरला असे काही नाही. टगेगिरीचे राजकारण हा शब्दप्रयोग महाराष्ट्रात अलीकडे आला असला, आणि "इलेक्टिव्ह मेरिट" च्या नावाखाली भाई ठाकूर्स आणि पप्पू कलानीजना काँग्रेससारख्या पक्षाने तिकीटे देणे हे प्रकार नव्वदीच्या दशकानंतर प्रचंड वेगाने देशभर (आणि सर्व पक्षांमध्ये) फोफावले असले तरी स्थानिक राजकारण हे कायमच टग्यांच्या हातात होते. थिंकिंग पॉलिटिशियन (प्लेटोचा फिलॉसफर किंग) हे अगदी वरच्या पातळ्यांवरच मर्यादित राहिले. पंडित नेहरु म्हणा, किंवा यशवंतराव चव्हाण म्हणा. आता तर त्या पातळीवरही वासेपुरी राजकारण स्थिरावत चालले आहे. वासेपूरमध्ये राजकारणाचा हा प्रकार थेट सामोरा येतो. 

वासेपुरचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सिनेमातील पात्रे आपल्याला त्यांच्या विचारांची मीमांसा त्यांच्या संवादांमधून सांगत बसत नाहीत. अनस्टेटेड नॅरेशन. "हमारे धंदेमे डर रहना जरुरी है" असली फिलॉसफी समजावणारी वाक्ये नाहीत. ही शैली भिडणारी आहे. तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडरमध्ये ही शैली दिसली होती. सखाराम असे का वागतो, चंपा असे का वागते - याची स्पष्टीकरणे/ अंदाज कुठेही कुणाच्याही संवादांमध्ये येत नाहीत. धिस स्टाइल ऑफ नॅरेशन मेक्स द शो हाँटिंग. (तरी नाटक माध्यमाच्या मर्यादांमुळे सखाराम स्वतःविषयी बरेच काही बडबडतो. सिनेमा माध्यमाला तेवढ्याचीही गरज नाही.) 
  
चित्रपट पाहून मूळ कादंबरी वाचायची उत्सुकता लागून राहिली आहे. बिमल मित्रांच्या साहेब बिबी गोलाम या कादंबरीचा पट असाच विशाल आहे (त्यावरचा सिनेमा हा त्या कादंबरीची थट्टा आहे). हा सिनेमा एक सबंध कालखंड उजळून टाकणारा आहे. आपल्या आकलनातील कच्चे दुवे सांधणारा आहे. बाकी चित्रपटातील तांत्रिक बाबींविषयी अज्ञान असल्याने मौन बाळगतो. सिनेमातील सगळेच आवडले, संगीत विशेष आवडले, हे आवर्जून नमूद करतो. कथानकाची ताकदच एवढी जबरदस्त आहे की सादरीकरण कसलाही सिनेमॅटिक इफेक्ट न वापरता केले तरी प्रभावी ठरते. छोटे छोटे कमी कालखंडांचे अनेक तुकडे करुन एकेक प्रसंग रंगवला आहे. त्यामुळे सिनेमात वेग प्रचंड राहतो, आणि कंटाळा येत नाही.  

थोडक्यात - मस्ट वॉच. 

४ टिप्पण्या:

  1. ह्म्म. म्हणजे आता हाही (प्रायॉरिटीवर) बघायला हवा.

    उत्तर द्याहटवा
  2. << मस्ट वॉच >>

    काहीच 'मस्ट' नसावं असं आपलं माझं मत :-)

    उत्तर द्याहटवा
  3. Akira Kurosawa cha rashomon pahilat sir .. Tyachyavar ek expert opinion havay tumchyakadun ..

    उत्तर द्याहटवा