बुधवार, ८ एप्रिल, २००९

भारतीय इतिहासातील सुवर्णयुग – एक प्रश्नचिन्ह (एक)


गुप्त काळापासून (४थे शतक) पुढे साधारणतः विजयनगरच्या पाडावापर्यंतच्या (सोळावे शतक) काळाला अभिजात युग (क्लासिकल एज) म्हणतात. (विजयनगर अपवाद धरायचा - ४थे ते १२वे शतकच खरे तर). याच काळाला विशेषतः गुप्त काळ आणि त्यालगतचा काळ -  साधारणपणे बाराव्या शतकापर्यंत - याला सामान्यतः सुवर्णयुग मानले जाते. भारतातून या काळात सोन्याचा धूर निघत असे असे म्हणतात. या काळात सर्वाधिक सोन्याची नाणी सापडली आहेत. अभिजात संस्कृत साहित्य (कालिदास इ.) या काळात जन्मले. पुढे पुढे विकसित होत गेले. महत्त्वाची आस्तिक आणि नास्तिक दर्शने (महत्त्वाचे - न्याय, वेदान्त) याच काळात विकसित झाली. आदि शंकराचार्य (८वे शतक) याच काळातले. भारतीय इतिहासातील युद्धांच्या रम्य कथा या काळापासून पुढे सापडतात. बुद्धीवैभव आणि बलवैभव या काळात शिखरावर होते. मोठी साम्राज्ये याच काळात घडली. (अर्थात याच्या अगोदरही होती – मौर्य, सातवाहन, कुषाण, शक. पण हा काळ काही वैशिष्ट्यांमुळे वेगळा ठरतो – पुढे हे येईलच). हर्षवर्धन (सातवे शतक) हा या काळाचा जणू उत्कर्षबिंदूच. जवळजवळ सबंध उत्तर भारत याच्या ताब्यात होता.

यानंतर राजपुतांचा वैभवशाली काळ येतो. राजपूत फक्त उत्तरेपुरते म्हणजे राजस्थानपुरते मर्यादित नव्ह्ते. सध्याच्या मध्यप्रदेशात (उदा. चंदेल, कलचुरी) होते, काश्मीर (लोहर), उत्तरप्रदेश (राठोड), बिहार-बंगाल (पाल, सेन), ओरिसा(भंज, चोळगंग, देव), आंध्र (चालुक्य,चोळ), तामिळनाडु (चोळ, पल्लव), कर्नाटक (चालुक्य, गंग, कदम्ब,सेन),महाराष्ट्र (चालुक्य,राष्ट्रकूट,वाकाटक,यादव), गुजरात(चालुक्य/ सोळंकी, प्रतिहार) या सर्व ठिकाणी होते. सगळे एकमेकांशी नात्यांच्या रेशीमगाठींनी बांधले गेले होते. (चोळ-पल्लवांना कुणी राजपूत म्हणत नाही, पण चालुक्य, गंग, कदंब आदिंशी यांचे अगदी जवळचे नातेसंबंध होते. यातले बरेचसे त्यांच्या गुणदोषांमध्ये सारखेच होते, त्यामुळे त्यांना एकाच गटात मोजायला हरकत नाही.) आठवे ते बारावे शतक – साधारणपणे. हे नामांकित योद्धे. हे हो्ते म्हणूनच सिंधपर्यंत आलेले आणि नुकतेच मुसलमान झालेले पराक्रमी अरब सिंधपर्यंतच थांबले. चालुक्य (गुजरात) आणि प्रतिहार (राजस्थान) यांची ताकत अफाट होती. यांच्या ताकतीपुढे काही चालले नाही तेव्हा अरब पुन्हा पश्चिमेकडे वळले आणि युरोप (विशेषतः स्पेन) आणि आफ्रिकेला हाल भोगावे लागले. भारत ‘हिन्दुस्थान’ राहिला यांकारणे. चालुक्य फार मोठे. हर्षवर्धनाला यांनीच नर्मदेवर अडवले. केरळ-तामिळनाडुच्या सीमेपासून गुजरातपर्यंत आणि गोव्यापासून आख्खा आंध्र यांच्या ताब्यात होता. पण चालुक्य आणि प्रतिहारांनाही पुरून उरले राष्ट्रकूट. चालुक्यांना हटवून दख्खनचे राजे बनले आणि एक काळ असा होता की यांचा झेंडा गंगेपासून रामेश्वरमपर्यंत फडकत होता. वेरूळची कैलास लेणी ही यांचीच देणगी.

यानंतरच्या लगतच्याच काळामध्ये मोठमोठाली मंदीरे बांधली गेली. उदा. दक्षिणेतील तंजावरचे बृहदेश्वर (राजराजेश्वर), खजुराहो, कोणार्क, पुरी, इ. (१०वे ते १२वे शतक). या सुरेख आणि थक्क करणाऱ्या कलाकृतींना प्रगत गणिताचे भक्कम अधिष्ठान होते. लीलावती (१२वे श), पंचसिद्धांत (७-८ वे श), समरांगणसूत्रधार(११वे श) इ. वैज्ञानिक ग्रंथ याच काळातले. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे कोपर्निकसच्या आधी हजार वर्षे सांगणारे आर्यभट्ट (५वेश), वराहमिहीर(८वे श), शून्याचा शोध लावणारे ब्रह्मगुप्त याच काळातले. शास्त्रीय संगीत, अभिजात नृत्ये – भरतनाट्यम, ओडिसी इ. – याच काळात विकसित झाली. कौतुक सांगता हजार पाने पुरणार नाहीत. या काळावर मी फिदा होतो, अजूनही आहे; पण...

हे असे सर्व असताना या वैभवशाली सुवर्णयुगावर प्रश्नचिन्ह का?

(क्रमशः)


(चित्रे इंटरनेट वरून)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा